Friday, March 9, 2018

व्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे

सारांष - पु. ल. देशपांडे (जन्म 8 नोव्हेंबर, 1919 आणि मृत्यु 12 जून, 2000) ह्यांनी व्यक्तिचित्रणे, प्रवास वर्णने, नाटक, विडंबन इत्यादी विविध वाड्.मय प्रकार हाताळलेले आहेत वाड्.मयाच्या विविध अशा क्षेत्रात सहजपणे संचार करून पु. ल. देशपांडेनी उल्लेखनीय वाड्.मयनिर्मिती केलेली आहे. त्यांना सन 1966 साली ’पद्मश्री’ आणि सन ’1990’ साली ’पद्मभुषण’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. सन 1974 साली इचलकरंजी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पु. ल. च्या ‘नसती उठाठेव’ (1952), ’बटाट्यााची चाळ’ (1958), ‘गोळाबेरीज’ (1960) या संग्रहातील विनोदी लेखनामुळे, ‘व्यक्ति अणि वल्ली’ (1962) या व्यक्तिचित्रांमुळे आणि ‘अपूर्वाई’ (1960) व ‘पूर्वरंग’ (1963) या त्यांच्या
प्रवासवर्णनामुळे मराठी माणसांच्या अनेक पिढ्यांच्या मनात घर केलेले आहे.

प्रास्ताविक- ‘व्यक्ति आणि वल्ली’ हे पु. ल. देशपांड्यांचे अतिशय गाजलेले व्यक्तिचित्रसंग्रहाचे पुस्तक आहे. या पुस्तकाला सन 1965 साली साहित्य अकादमीचा सन्माननीय पुरस्कारही लाभलेला आहे. ‘व्यक्ति आणि वल्ली’ (1962) हा त्यांचा ललित व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजमितीस मराठी साहित्यामध्ये प्रकाशित झालेल्या व्यक्तिचित्रात्मक संग्रहापेक्षा हा संग्रह सर्वस्वी आगळा-वेगळा आणि गुणवत्तेच्या दृष्टीनेही सरस असा आहे. या पुस्तकात एकूण 20 लेख समाविष्ट आहेत. सन 1943 साली ‘अभिरुची’ मधून पु. ल. देशपांडे या नावाने आण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रकाशित झाले. त्यानंतरच्या अशा 18 व्यक्तिचित्रांची पहिली आवृत्ती सन 1962 साली प्रसिद्ध झाली. पाचव्या आवृत्तीत ‘तो’ आणि ‘हंड्रेडपर्सेंट पेस्तनकाका’ या दोन व्यक्तिचित्रांचा समावेश होऊन या संग्रहाच्या आजमितीस तेहतीस आवृत्या निघालेल्या आहेत.

पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ति आणि वल्ली’ या संग्रहात काल्पनिक व्यक्तिचित्रांचे नमुन आढळतात. ही व्यक्तिचित्रे काल्पनिक असली तरी रोजच्या जीवनात थोड्याफार फरकाने कुठे ना कुठे तरी भेटणारी आहेत. चितळे मास्तर, अंतू बर्वा, नारायण इत्यादी व्यक्तिरेखा अस्तंगत होत चाललेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. आणि माणूसपण जपणारी, मूल्यांची बुज राखणारी, ध्येयापोटी मायेपोटी निःस्वार्थपणे राबणारी, प्रतिकुल परिस्थितीतही जगण्याचा आनंद घेणारी, कलेवर वाड्.मयावर भाबडे प्रेम करणारी, चालती - बोलती जिवंत माणसे विविध मानवी प्रवृत्तीचें नमुनेच आहेत. यातील व्यक्तिरेखा विलक्षण समरसतेने रेखाटल्या गेल्या आहेत. त्यात कल्पित आणि वास्तव यांचा मेळ घालून साधलेली नवनिर्मिती लालित्यपूर्ण आहे. या व्यक्तिचित्रसंग्रहातील कल्पकता, भावपूर्णता आणि सांस्कृतिक संदर्भसंपन्नता या बाबीही महत्त्वपूर्ण आहे. पु. ल. देशपांड्यांचे नाट्यपूर्ण निवेदन, खुमासदार, गहिर्‍या रंगाचा विनोद आणि बहुढंगी शैली यामुळे या व्यक्तिचित्रांची अमिट छाप महाराष्ट्रीय रसिकांवर उमटलेली आहे.

‘नारायण’ हा पु. ल. देशपांडे यांचा व्यक्तिचित्रात्मक पहिला लेख आहे. सार्वजनिक कार्यात निःस्वार्थपणे सहकार्य करणार्‍या, लग्नकार्यात हजार अवधाने सांभाळणारा आणि लग्नाच्या खरेदीपासून ते वरातीपर्यंत बिनचुक काम करीत रहाणारा नारायण, त्याच्या अनेक लकबींसह पु. ल.देशपांडे यांनी चित्रित केलेला आहे. सर्वांच्या उपयोगी पडावे, कोणी बोलावो अथवा न बोलावो, धावत जाऊन पडेल ते काम करावे अशी इच्छा बाळगणार्‍या नारायणाचे शब्दचित्र पु. ल. नी अतिशय जिव्हाळ्याने रेखाटलेले आहे. कुणाच्याही इथे मंगलकार्य निघो,साखरपुड्यापासून वरातीपर्यंत सारे काही यथासांगपणे निभावून नेण्याची जबाबदारी आपणावरच सोपविली आहे. अशा श्रद्धेने तो लग्नमंडपात वावरत असतो. ‘नारायण’ हा एक सार्वजनिक नमुना असून असा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. ‘हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात.’ ‘मळकट धोतर - डोक्याला ब्राऊन टोपी’ अशा शब्दांत नारायणाचे बाह्यरूप लेखकांने रेखाटलेले आहे. अशी ही नारायणाची भाबडी, कष्टाळू, सरळ मनाची व्यक्तिरेखा उभी करून पु. लं. नी व्यक्तिचित्रणाचा उत्कृष्ट नमुना वाचकांसमोर ठेवला आहे.

‘हरितात्या’ ही या व्यक्तिचित्रसंग्रहातील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. इतिहासाशी संपूर्णतः समरस झालेल्या आणि मनाने सदैव भुतकाळत वावरणार्‍या शिवबा, रामदास, जनकोजी शिंदे, शेलारमामा, तानाजी यांच्या गोष्टी लहान मुलांना सांगून त्यांचे आदर्श कोवळ्या मनावर ठसविणार्‍याएका ध्येयवेड्याा म्हातार्‍यांचे हे शब्दचित्र आहे. काही नाटककारांनी अथवा साहित्यिकांनी इतिहासकारांना अन् इतिहास संशोधकांना अर्धवटांच्या कोटीत ढकलून त्यांची निष्ठा हास्यास्पद करून सोडण्याचा आणि आपल्या उथळ विनोदबुद्धीचे प्रदर्शन करण्याचा बालीश प्रयत्न केलेला आहे. तसला मोह हरितात्यांचे वर्णन करताना पु. ल. नी होऊ दिलेला नाही. ‘नामू परीट’ ही अगदी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी लाभलेली व्यक्तिरेखा आहे. दुसर्‍यांचे कपडे धुवायला आणल्यावर स्वतःच काही दिवस ते कपडे वापरण्यात त्याला काहीच दिक्कत वाटत नाही. चोरीची सायकल खरेदी केल्याचे सांगताना तो अजिबात कचरत नाही. अमुक ठिकाणच्या हातभट्टीची आपणही झोकत असतो. हे राजरोसपणे कबुल करताना त्याच्या चर्येवर शरमिंधेपणाचा भाव उमटत नाही. असा हा निःसंग, बेडर मनाचा नामू परीट वाचकांसमोर उभा करताना पुलं.नी त्याच्या व्यक्तित्वाचे काही विलोभनीय विशेषही जिव्हाळ्याने टिपलेले आहेत. ”सदैव कपड्याांच्या जगात वावरणारा इतका नागवा माणूस माझ्या पाहण्यात नाही.” असे नामूबद्दलचे आपले मत जाहीर करता करताच ते त्याच्यातल्या माणुसकीचे कणही कौशल्याने टिपतात. ‘बबडू’ ची व्यक्तिरेखाही जवळपास याच जातीची आहे. नामू परिटचा स्वभाव इरसाल खरा पण त्याचा धंदा शहाजोगपणाचा आहे. परंतु ‘बबडु’ च्या मनाची ठेवण जशी बेछूट तसा त्याचा धंदाही फटिंगपणाला साजेसाच आहे. खिसेकापण्याच्या अन् हातभट्टीच्या धंद्यावर गबर होण्यात त्याला कसलीच तमा वाटत नाही. पण काळ्याकभिन्न कातळातही कुठेतरी ओलावा पाझरत असावा तसा त्याच्या वृत्तीत चांगुलपणाचा बारीक पाझर झिरपत असतो.

‘सखाराम गटणे’ म्हणजे नामू परीट किंवा बबडू बत्तीवाला याच्या अगदी उलट टोकाला गेलेली व्यक्तिरेखा आहे. वयाची तिशी न ओलांडलेला हा पोरसवदा तरुण कमालीचा पापभीरू विनयशील आणि  आज्ञाधारकवृत्तीचा असतो. थोरा-मोठ्याांचे अनुकरण करण्याचा आणि त्यांचा उपदेश शिरोधार्य मानण्याचा त्याला एकमेव आवडता छंद असतो. जन्मभर अविवाहित राहण्याच्या आपल्या प्रतिज्ञेच्या आड आपले वडिल येत आहेत हे पाहून सखारामने लेखकाच्या मध्यस्थीने त्यांचे मन वळवून पहाण्याचा विचार केला. परंतु साक्षीदाराने आयत्या वेळी विरुद्ध बाजुचीच कड घेतलेली पाहून वादीची जशी अवस्था होते. तसाच काही अनुभव सखारामलाही येतो. वडिलांची प्रबळ इच्छा म्हणून म्हणा अथवा नियतीचा तसा संकेत होता म्हणून म्हणा, गटणेचे पाय जमिनीला लागले. तो माणसात येऊन त्याच्या डोळ्यांवरली अवास्तव ध्येयवादाची नशा खाडकन उतरून चार-चौघांनसारखा बोलू-चालू लागतो. सखाराम गटणे मार्गी लागल्याचे लेखकालाही समाधान झालेले असते.

‘नंदा प्रधान’ ही व्यक्तिरेखा प्रस्तुत संग्रहातल्या सर्व व्यक्तिरेखांपेक्षा सर्वस्वी अगदी भिन्न आहे. ही व्यक्तिरेखा वाचताना कोणताही संवेदनशील वाचक डोळ्यात साठलेले अश्रू पुसल्याशिवाय पुढे वाचूच शकत नाही. ‘नंदा प्रधान’ च्या आयुष्यातील काही हळूवार क्षण पु. लं. नी तितक्याच हलक्या हाताने आणि कमालीच्या कलात्मक संयमाने चित्रित केलेले आहेत. ‘बोलट’ या लेखात एका दुर्देवी नटाची शोकांतिका पु. ल. नी रेखाटलेली आहे सहृदयता आणि उपरोध यांच्या मनोहर मिलापामुळे सदर शोकांतिका विशेष वाचनीय बनलेली आहे. जुन्या काळातील अनेक महत्त्वकांक्षी नटांचा प्रतिनिधी वाटावा असा हा जनार्दन नारो शिंगणापूर पु. लं. नी मोठ्या कौशल्याने आपणापुढे उभा केलेला आहे. जुन्या काळातील नटांचा भाबडेपणा, अशिक्षितपणा, व्यसनाधिनता, रंगेलवृत्ती वगैरे सार्‍या गुणावगुणांचे यथार्थ दर्शन नारोच्या रूपाने आपणाला घडत रहाते. हे दर्शन घडविताना लेखकाने उपहास-उपरोधाच्या अनेक छटा वापरून त्याची वेधकता वाढविलेली आहे. ‘भय्या नागपूरकर’ याचा तोंडवळा ’तुज आहे तुज पाशी’ मधल्या थेट काकाजींच्या चेहÚयाशी मिळता जुळता आहे. दारूच्या नशेत आकंठ बुडूनही तो माणुसकीला पारखा झालेला नसतो. त्याच्या कपाटात दारूच्या बाटल्या आणि रेसची पुस्तकेही असतात. त्याच्या घरात गांधीजींचा छोटासा पुतळा आणि नेहरूंचे ग्रंथही असतात.

‘नाथा कामत’ हे प्रणयाने पेटलेल्या आणि धुंद झालेल्या एका कलंदर युवकाचे व्यक्तिचित्र आहे. त्याला सुंदर-सुंदर पोरींच्या प्रेमात पडण्याची सवय जडलेली आहे. लावण्यवतींच्या मादक कटाक्षानी विरुद्ध होण्यासाठीच जणु विधात्याने त्याला ‘हृदय’ नावाची वस्तू बहाल केलेली आहे. नाथा कामताचे समस्त स्त्री वर्गाविषयीचे आकर्षण पण लंपटतेचा संपूर्ण अभाव ही मानवी मनाची विसंगती पु. ल. नी अचूकपणे टिपलेली आहे पार्ल्यातल्या एकुण एक कुमारिकेचे नाव अन् घर नंबर तोंडपाठ असलेला, त्यांच्या सौंदर्याचा तपशिल बिनचुकपणे वर्णन करून सांगणारा हा नाथा कामात अनेक पोरींच्या प्रेमात पडला आणि पुनः पुन्हा सावरलेला आहेप्रेमभंगानंतर नाथा कामत एके दिवशी अचानकपणे बोहल्यावर चढून मार्गी लागतो. प्रणयाच्या पार्श्वभूमीवर ही व्यक्तिरेखा रेखाटताना पु.ल. नी प्रणयातील विशुद्धदृष्टी त्याला बहाल केलेली आहे. ‘दोन वस्ताद’ या लेखात पुलं. नी तबलजी आणि पहिलवान या दोघांच्या गताआयुष्यातील दोन अविस्मरणीय घटना त्यांच्या तोंडून वदवता - वदवता सध्या ते जगत असलेल्या हलाखीच्या जीवनाचे चित्र रेखाटलेले आहे. पु. लं. नी दोन भिन्न क्षेत्रांतल्या पुरुषसिंहाविषयी वाचकाच्या मनात आदराबरोबरच असीम करुणाही उत्पन्न केलेली आहे

गजा खोत, अण्णा वडगावकर, परोपकारी गंपू, चितळे मास्तर, लखू रिसबूड, बापू काने, तो, अंन्तू बर्वा,हंड्रेरडपर्सेंट पेस्तनकाका ही या व्यक्तिचित्रसंग्रहातील व्यक्तीचित्रेही आपापल्या परीने वैशिष्ट्यापूर्ण ठरलेली आहेत. यातील कोणी सरळ स्वभावामुळे, कोणी भाबडेपणाने, कुणी परोपकारी वृत्तीमुळे तर कुणी इरसाळ खवचटपणामुळे वाचकांच्या मनात सदैव अधिराज्य गाजवतात. ’अन्तू बर्वा’ म्हणजे कोकणच्या मायाळूपणाचा आणि इरसालपणाचा पुरेपुर अर्क उतरलेली व्यक्ती याचा चरितार्थ कोकणच्या वयस्कांप्रमाणेच मनिऑर्डरवरच चालतो. अन्तू बर्व्याची भाषा ही अतिशय वेगळी, कायम तिरकस जाणारी आणि मिष्किलपणे भरलेली आहे. साधेचहात दूध कमी आहे हे सुद्धा हा माणूस सरळ न सांगता ‘रत्नार्गीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभन काय रे झंप्या’ असे म्हणून तो फुकटचा चहा ढोसत असतो. ‘अण्णू गोंगट्याा होणे’, ’तर्जनी नाशिका न्याय’, ’बीबीसीआय’ ला आय.पी.चा डबा जोडणे हे अंतू बर्व्याचे काही वाक्यप्रचार खूपच प्रसिद्ध आहेत. या अंतू बर्व्याची ही दीनवाणी पण मिष्किलमूर्ती अंतःर्बाह्य आणि सुखद आणि चित्रमय पद्धतीने पु. ल. नी विलक्षण प्रत्ययकारीपणे रेखाटलेली आहे कोणत्याही विषयावर आपल्या मताची पिंक टाकल्याशिवाय या माणसाला स्वस्थ बसवत नाही. ‘चितळे मास्तर’ या लेखात या व्यक्तिरेखेच्या निमिताने त्या क्षेत्रातील बारकावे नेमकेपणाने लेखकांनी टिपलेले आहेत.

‘लखू रिसबूड’ हा लेख तर ’पुरुषराज अळूरपांडे’ शैलीचाच अस्सल नमुना आहे. बुद्धिजीवी
म्हणविणार्‍या वर्गाचा साहित्यात क्रांती करून सोडण्याची ऊठसुट प्रतिज्ञा करणाÚया अहमन्य, अप्रामाणिक ,वाचीवीरांचा प्रातिनिधिक नमुना म्हणून करतात. नामू परीट ‘वाईट होणे’ या अर्थी ‘फॉग होणे’ असा शब्दप्रयोग करतो. अंतू बर्वा याचा ‘पडणे’ या अर्थीचा नवा वाक्प्रचार आहे. - ‘‘अण्णू गोगट्या होणे केवळ शब्दप्रयोगच नव्हे तर प्रत्येकाच्या बोलण्याच्या शैलीचे वैशिष्ट्यही यात लक्षात घेतलेले आहे. परोपकारी गंपू कायम प्रश्नालंकारयुक्त शैलीत बोलतो. बापू काणे प्रत्येक गायिकेचा ‘इन’ प्रत्ययान्त उल्लेख करतो. नामू परीट व नंदा प्रधान यांची संभाषणशैली तुटक आहे.

‘व्यक्ति आणि वल्ली’ मध्ये प्रचलित वाक्प्रचारांचा वापरही मुबलक प्रमाणात नि तरीही सहजपणे झालेला आढळतो. व्यक्तिरेखांच्या दैनंदिन जीवनातील भाषेशी जवळिक साधलेली आहे. पु. ल. यांच्या लेखनात भाषेचे तल्लख असे भान जागोजाग पहावयास मिळते. त्यामध्ये कोट्या, शब्दनिष्ठ विनोद, विरुद्ध अर्थी शब्दांचा खुबीदार वापर यांना अर्थातच अग्रक्रम मिळालेला आहे. यातील अनेक व्यक्तिरेखा साहित्य नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलाक्षेत्रांशी संबंधित आहे. बापू काणे ही सामाजिक संस्थांमध्ये वावर असलेली व्यक्ती आहे. तत्कालीन सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवनाचे सांस्कृतिक अंगाने केलेले चित्रणही त्यात समाविष्ट आहे.

पु.लं. च्या ’व्यक्ति आणि वल्ली’ ची सर्व समावेशकता आणि त्रिकालाबाधिता ही नजरेत भरणारी दोन वैशिष्ट्ये आहेत. या संग्रहाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती वा क्षेत्राचे, भोवतालच्या परिस्थितीचे पुलं.नी केलेली अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि चित्रण हे आहे. या संग्रहाच्या नावाप्रमाणेच यातील प्रत्येक व्यक्तींमध्ये एक एक वल्ली दडलेली आहे. यातील बहुतेक व्यक्तिचित्रे हे प्रातिनिधिक स्वरूपाचे नमुने सादर करतात. व्यक्तिचित्र लेखनातील आत्यंतिक सहजता हे या संग्रहाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये कृत्रिमता अथवा ओढाताण यांचा लवलेश अजिबात सापडत नाही. वातावरण, काळ वेळ, यानुसार बदलणारी व अत्यंत परिणाम साधणारी भाषा ही ‘व्यक्ति आणि वल्ली’ ने दिलेला मराठी वाड्.मयाचा एक अलंकार आहे असे म्हटल्यास अतिश्योक्ती होणार नाही. या व्यक्तिचित्रणात पु. लं. च्या विनोदबुद्धीचा प्रत्यय तर जागोजाग येतोच पण त्याचबरोबर वर्ण्य व्यक्तीकडे पाहण्याचा त्यांचा जिव्हाळ््याचा दृष्टिकोन, मानवी स्वभावातील विविधता अन् वैचित्र यांचे दर्शन घडविणारी त्यांची सुक्ष्म निरीक्षण शक्ती, वर्णनशैलीतील मार्मिकता वगैरे गुणांचाही प्रत्यय येतच राहतो. सर्वच व्यक्तिचित्रे ही नितांत सुंदर आणि वाचनीय बनलेली आहेत. पंचपक्वानांनी भरलेल्या ताटात कोणता पदार्थ चांगला आहे हे सांगणे जसे कठीण आहे तशीच स्थिती इथेही झालेली आहे. व्यक्ती साक्षात साकार करण्याचे सर्व गुणधर्म समाविष्ट असणाÚया व्यक्तिचित्रणामधून भावनेचा ओलावा, अंतर्यामीचा जिव्हाळा आणि कारूण्याची झालर यांचा जो संगम ’व्यक्ति आणि वल्ली’ मध्ये पहावयास मिळतो. तो केवळ अभुतपूर्व आहे. समतोल लेखनपद्धतीमुळे ही सर्वच व्यक्तिचित्रे सरस ठरलेली आहेत.

‘ते चौकोनी कुटुंब’ मधील संसाराला छापील ग्रंथांची अवकळा आणू पहाणारे मालतीबाई-माधवराव हे दांपत्यही वाचकांच्या मनोरंजनाचा विषय बनतात. नारायण, हरितात्या, अंन्तू बर्वा, चितळे मास्तर, बापू काणे, परोपकारी गंपू या सर्व व्यक्तिरेखा त्या काळच्या कनिष्ठ मध्यमवर्गियांतील आहेत. पण तरीही त्यांचे भाषेचे वळण वेगवेगळे राखण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. अंतू बर्वा आपल्या बोलण्यात प्रादेशिक असा सानुनासिक कोंकणी ढंग आणि स्वभावभूत तिरकसपणाचा ढंग कायम राखतो. एकप्रकारे खास वल्लीपणा आणि आनुषंगिकरीत्या आलेला प्रादेशिकपणा यांची सांगड घातली जाते. उदाहरणार्थ- ”परांजप्या, जागा आहेस की झाला तुझा अजग!” (पृ.222) अशी ‘फुरशासारखी गिरकी’ घेऊन येणारी त्याची भाषा खास त्याची आहे. परोपकारी गंपू, प्रा. अण्णा वडगावकर, भैय्या नागपूरकर, ज्योतिबा वस्ताद या व्यक्तिरेखांचा निमित्ताने लेखकाने तर्‍हे तर्‍हेच्या भाषिक वैशिष्ट्याांचे बारकाईने चित्रण केलेले आहे. या सर्वांपेक्षाही अगदी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तिरेखा आपापल्या भाषिक अवकाशासह साकारतात. सिनेव्यवसायात वावरल्यामुळे इंग्रजी शब्द वापरण्याची सवय जडलेला हा नामू ’पिच्चर’ ’ड्वायलाक’ असे उच्चार करून इंग्रजी शब्द पार ग्रामीण ठशाचे करून टाकतो. त्याची ‘न’ चा ‘ण’ आणि ‘ण’ चा ‘न’ (उदाहरणार्थ - ‘मॅणिजर,’ ‘अन्नासाहेब’) करण्याची लकब त्याच्या बोलीचा ठसका दाखवून देतात. बबडू ही तर एक प्रकारे अधःस्तरातील - गुन्हेगारी वर्तुळातील व्यक्तिरेखा आहे. त्याच्या भाषेचा वेगळा बाजही लेखकाने चांगला पकडला आहे. उदाहरणार्थ-”कोर्टात बुराक पाडायचे पैशे आपले-वर मह्यन्याच्या एका तारखेला पगार-साली चाळीस पोर पोसत होती.” (पृ.214) लेखकाच्या भाषेत एकप्रकारचा भरघोसपणा आहे.
या व्यक्तिरेखा साकारताना लेखक कथनशैली एकच वापरत नाही. त्यात तृतीयपुरुषी निवेदनापेक्षा संवादाला अधिक स्थान मिळालेले आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्रांमध्ये कथात्मता आणि नाट्यात्मताही आलेली आहे केवळ ‘संवाद’ तंत्र वापरून येथे नाट्यात्मता आलेली नाही. तर एकाच सुरात दोन वेगवेगळ्या पातळ्यांचे चित्रण करणारी शैली योजल्यामुळेही नाट्य निर्माण झाले आहे. उदाहरणार्थ - नामू, कपडे बाजूला ठेव, लॅबोरेटरीतला गणपत तो - यक डोळा काचेचा असल्यला, पायजम्याला नाडी नाही, बघून घ्या. (पृ.38) पु. लं. यांच्या भाषेतील नाट्याात्मता त्यातील ’उच्चारनिष्ठते’ मुळेही निर्माण झालेली आहे. पु. लं. हे विशिष्ट व्यक्तीच्या तोंडचे उद्गार अचूक टिपून एकप्रकारे त्या शब्दांना वाचिक अभिनयाचे मूल्य जोडून देतात पु.लं.च्या ’व्यक्ति आणि वल्ली’ या व्यक्तिचित्र संग्रहामुळे साहित्याच्या कक्षा निश्चितच विस्तारतेल्या आहेत

लेखक - प्रा. गणपत हराळे
साहाय्यक प्राध्यापक,
गणपतराव आरवाडे वाणिज्य महाविद्यालय, सांगली.


0 प्रतिक्रिया: