Saturday, December 12, 2015

पुलंना लिहिलेलं पत्र

मी अमोल लोखंडे. भाईंचा चाहता. किती मोठा ते सांगायला उचित परिमाण सध्यातरी उपलब्ध नाहीये. गेल्यावर्षी वाढदिवसानिमित्त मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तुमचे ब्लॉग वाचत असता असं वाटलं की तुमच्याशी ते पत्र शेअर करावं!
जरूर वाचा!!


तीर्थस्वरूप भाई,
आपल्या चरणी बालके अमोलचा साष्टांग नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, येत्या आठ नोव्हेंबरला तुमचा जन्मदिवस आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! खूप दिवसांपासून... नाही खूप वर्षांपासूनचा आपला स्नेह आहे. (स्नेह हा शब्दही काही योग्य वाटत नाहीये.. त्यापेक्षा नातं हा शब्द योग्य) तर खूप वर्षांपासूनचं आपलं नातं आहे. मी तुमचा नातू आणि आमचे आजोबा! बरोबर ना? हे काही एका रात्रीत निर्माण झालेलं नातं नाहीये किंवा कुणी लादलेलंही नाही. हे आपोआप निर्माण झालेलं स्वीकृत नातं आहे. तसंही सध्याच्या काळात लादलेल्या नात्यांपेक्षा आपणहून स्वीकारलेली नातीच जास्त टिकाऊ असतात. माझ्या दुर्दैवाने मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. तसा मी काही सखाराम गटणे नाही; त्यामुळं माझं वाचन अफाट वगैरे नाही. दहावीनंतरच्या सुटीत सहज उत्सुकता म्हणून मी तुमच्या रावसाहेब, हरीतात्या व नारायण या कथा ऐकल्या. विश्वेश्वराचा तो एक संकेतच असावा! मी आयुष्यभर ऋणी आहे त्या क्षणाचा ज्याने माझ्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण केलं. कारण भरकटण्याच्या त्या अजाण वयात मला एका वेगळ्या खजिन्याचा शोध लागला होता. असा खजिना जो कितीही लुटला तरी न संपता वाढतच जाणारा. आयुष्यात पहिल्यांदा मला खरा आनंद गवसला. तुमच्यापासून काय लपवणार म्हणा! तुमच्या कथाकथनाच्या जवळपास सगळ्या ध्वनीफितींचा संग्रह हा मी बाबांच्या खिशातून पैसे चोरून केलाय. काय करणार! व्यापारी प्रवृत्तीच्या दृष्टीने जिथे 'साहित्य' म्हणजे ज्याची विक्री करून चार पैसे नफा मिळवण्याचीच गोष्ट असते तिथे हे माझं नवं वेड कसं मान्य होणार? तरी त्यातून कसंबसं अंग चोरत मी माझी हौस पुरी करत होतो. आजपर्यंत तुमच्या सगळ्या ध्वनीफितींची असंख्य पारायणं झाली पण तरीही त्यातून प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच शोध लागला. सततच्या अशा ऐकण्याने माझ्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मला तुमचीच ती मिश्कील मूर्ती दिसू लागली. एकदा (एकदा नाही कैकदा) तुम्ही माझ्या स्वप्नात आला होतात. तुम्हांला आठवतंय? अशाच एका स्वप्नात रावसाहेबांनी मला फोनवरून तुम्ही बेळगावात येणार असल्याची वर्दी दिली होती आणि मी धावतपळत पडत तुम्हाला भेटायला आलो होतो. 'रिझ' थेटराच्या त्या कट्ट्यावर कितीतरी वेळ आणि कितीतरी विषयावर आपण गप्पा मारत बसलो होतो. चार्लीबद्दल, अॉस्कर वाईल्डबद्दल काय भरभरून बोलला होतात तुम्ही! चार्लीबद्दल मी आधीपासून बरंच ऐकून होतो पण अॉस्कर वाईल्ड हे नाव प्रथम तुमच्या तोंडूनच प्रथम ऐकलं. त्यारात्री इंटरनेटवरून अॉस्कर ची चार नाटके ध्वनीफितीच्या स्वरूपात मिळवली आणि ऐकली. 'The Picture of Dorian Gray', 'A Woman of No Importance', 'The Importance of Being Ernest' आणि 'Lord Arthur Savile's Life' इ. नाटकांचं ध्वनीप्रसारण बीबीसी रेडिओवरून झाले आहे. तसं माझंही इंग्रजीचं ज्ञान हे इंग्रजांनी हाय खावी असंच आहे. पण तरीही अॉस्करची शैली इतकी साधी आणि सरळ होती की मला समजण्यास जास्त अडचण आली नाही. अजून त्याचं खूप काही वाचणार आहे.

चार्लीबद्दल तर काय सांगावं? उगाच शब्द वाया घालवणार नाही. अफलातून माणूस एवढंच म्हणेन. त्याचे बहुतेक सर्व सिनेमेही मी कैकवेळा पाहिले आहेत. याचे सिनेमेही काळाच्या समांतर जातात. द किड, सिटीलाईटस्, मॉडर्न टाईम्स, द सर्कस, द ग्रेट डिक्टेटर किती नावं सांगू!

तुमच्यामुळे माझ्या मनात जसं चार्लीबद्दल आकर्षण निर्माण झालं तसंच ते पंडित भीमसेनजी, पंडित वसंतराव देशपांडे, गदिमा यांच्याबद्दलही झालं. हे तुमचे माझ्यावर झालेले संस्कार आहेत असं मी मानतो. काय भारी चित्र असेल ना ते? तुम्ही सगळी मंडळी रात्र-रात्र वेगवेगळ्या विषयावर गप्पागोष्टी करत बसला आहात, अधूनमधून गाण्याच्या फर्माईशी पूर्ण करत आहात! याचा माझ्या मनावर असा काही परिणाम झाला की मी माझ्या आजूबाजूच्या कलाकार आणि कलंदर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊ लागलो. शोधल्याने सापडते. माझंही मैत्र विस्तृत झालं. यात वयाची, ज्ञानाची कसलीही अट नाही. प्रत्येकजण हा आनंदभोगी. कुणी गायक, कुणी वादक, लेखक, नृत्यकलाकार, चित्रकार.. खूप आणि खूपच. याबाबतीत मी रावसाहेबांचा आदर्श समोर ठेवला. मुक्त आस्वाद घेण्याचा. तुम्हाला एक सांगायचं राहिलंच; त्यादिवशी माझ्या घरी साक्षात् पंडित भीमसेनजी आले होते, आले ते आपल्या वाद्यवृंदासह तडक माझ्या खोलीत शिरले. मला काहीच कळेना. माझ्याशी एकही शब्द न बोलता पंडितजींनी 'जो भजे हरी को सदा' पासून ते राम, कृष्णाची सगळी भजने ऐकवली. सगळे एकामागून एक धक्के! शेवटी ती मैफिल संपली आणि त्यांचे सहकारी ती सगळी वाद्यं बंद करून गोल रिंगण करून बसले. फारच मजेशीर सीन होता तो. तुम्हाला सांगतो त्या रिंगणात मी असा कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन बसलेला की हे नेमकं काय चाललंय? आणि माझ्याशी अजूनही कुणी काहीच का बोलत नाही? माझ्यासमोर पंडितजी बसले होते शेवटी एकदाचे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, "आता बोल तुला काय बोलायचं आहे!" मी अजूनही धक्क्यातून नीट सावरलो नव्हतो. त्या परिस्थितीत मी त्यांना काय विचारावं? तर, "पंडितजी, तुम्ही पुलंचा सहवास अनुभवला आहात, त्यांच्यासोबत तुमची खूप चांगली मैत्री होती, तुमच्या कितीतरी मैफिलीत पुलंनी हार्मोनियमवर साथ केली. मला त्यांच्या काही आठवणी सांगाल का?" पंडितजी हसले व म्हणाले, "अरे खूप आठवणी आहेत. त्या सगळ्या सांगणं काही शक्य नाही पण भाईबद्दल एकच सांगतो. माझ्या पूर्वजन्मी देवाने प्रसन्न होऊन मला वर मागायला सांगितला होता. मी म्हटलं मला स्वर्गात राहायचं आहे." देव हसला आणि तथास्तु म्हणाला. पाहतो तो काय तर मी पुलंच्या काळात जन्मलो होतो. नुसता जन्मलोच नाही तर त्यांच्यासोबत मैत्रीही झाली." भाई, ते ऐकून माझ्या अंगावर शहारा आला आणि दचकून जागा झालो. तेव्हा समजलं की हे स्वप्न होतं. (त्यादिवशी मी बराच वेळ पंडितजींनी गायलेली भजने ऐकली होती बहूतेक त्यामुळेच हे स्वप्न पडलं असावं). अहो पंडितजींचं हे उत्तर ऐकून खरं सांगू का मला त्यांचा हेवा, असूया, मत्सर वगैरे वगैरे जे काही असतं ना ते सारं वाटू लागलं. मी ना भाई, सत्तरेक वर्षे आधी जन्मलो असतो तर खूप भारी झालं असतं. अजिबात तुमची पाठ सोडली नसती. (ती तशी आताही सोडलेली नाहीय हा भाग अलाहिदा!)
मी रत्नागिरीला शिकायला होतो त्यावेळी गाडी जेव्हा हातखंब्याच्या फाट्यावरुन जायची तेव्हा तुम्ही, तो मधू मलुष्टे, ती सुबक ठेंगणी, ते मास्तर, झंप्या, उस्मानशेट, स्थितप्रज्ञ कंडक्टर-डायवरची जोडगोळी, बिनधास्त कुठेही पानाच्या पिंका टाकणारा तो आर्डर्ली, असंख्य पिशव्या आणि मुख्य म्हणजे ते खादीधारी पुढारी व अपघातग्रस्त म्हैस या सर्वांची आठवण येत असे. यापैकी कुणीतरी तिथे दिसेल का म्हणून नकळत गाडीच्या खिडकीतून डोकावायचो आणि त्यापैकी बरीचशी पात्रे दिसायचीही; पण नाव बदलून! तशी तुमची सगळीच पात्रे मला सगळीकडे दिसतात. मी रत्नांग्रीत पाऊल टाकल्यावर पहिल्यांदा मधली आळी शोधून काढली. बरेच अंतू भेटले आणि अनुभवले. काही जणांना वाटतं की अंतू, नारायण, चितळे मास्तर, रावसाहेब म्हणजे विनोदी पात्रे आहेत आणि ती खळखळून हसवतात. 'पोफडे उडालेल्या भिंती आणि गळकी कौलै पाहायला वीज हो कशास हवी?', 'अरे दुष्काळ पडलाय इथे आणि भाषणे कसली देतोयस? तांदूळ दे!' 'अहो बायकोचं हेल्थ बोंबललं; कायतर टिबीगिबी झालं असणार! सिनेमाचं यवडा मोठा गल्ला येतंय फुड्यात!! कसं आवरणार मन?', 'वो पीयल, हे माणूस फुडारी होतंय म्हणजे काय शिकल्यावर होतंय वो सांगा की?', 'कशाला आला होता रे बेळगावात?', 'पुर्शा, फुकट रे तू! टाईम्स हँव चेंजड्' ही वाक्ये फक्त हास्याचे फवारे उडण्यासाठी नाहीत असं माझं ठाम मत आहे. भावूक नंदा, उचल्या हरी काळूस्कर, बढाईखोर नाथा कामत ही मात्र फार मजेशीर पात्रं आहेत. बाकी तुम्ही तुमच्या कथाकथनात या व्यक्तीरेखांना जे आवाज दिलेत ना ते अगदी त्यांचा स्वभाव व्यक्त करतात. त्यातल्या एकाचाही आवाज दुसऱ्या कुणाला दिलेला नाही हे विशेष. मी तुम्हाला विनोदी लेखकच नाही तर तत्त्ववेत्ता समजतो. तुमची भाषणे वाचल्याचा हा परिणाम दुसरं काय! अमेरिकेतील तुमचं अध्यक्षीय भाषण तर कळस आहे. १९८२ साली म्हणजे आजपासून साधारणपणे ३२ वर्षे आधी तुम्ही मुलांवर संस्कारांबद्दल तक्रार करणाऱ्या पालकांचे कान टोचणे खरंच गरजेचे होते. आई-वडिलांपेक्षा जास्त संस्कार हे आजी-आजोबा करत असतात. ह्यात जर ते नातवंड काँव्हेंटला शिकत असेल आणि घरात येऊन इंग्रजीतच बोलत असेल तर मग कसं होणार? अशामुळे आजीचा आणि नातवाचा संवाद संपत चाललाय हे तुम्ही जे म्हणालात ते मी अगदी तंतोतंत अनुभवलंय. आपलं रक्त आपल्या समोर बागडत असतं आणि आपण त्याच्याकडे परक्यासारखं पाहत राहतो हे चित्र फारच क्लेशदायक आहे. बरं त्या लेकराच्या आई-वडिलांचा इंग्रजीतच बोलण्याचा किती अट्टहास असतो बघा; स्वतःचं इंग्रजी बिनअस्तराचं आणि बाता अशा मारायच्या जणू त्यांच्या तोंडून शेक्सपियरच बोलतोय. असो. तुम्ही कान टोचणंच योग्य होतं.

तुमचं लिखाण हे काळाच्या समांतर जाणारं आहे म्हणूनच की काय आजच्या या टेक्नोसेव्ही महाराष्ट्रात तुमची लोकप्रियता टिकून आहे. आम्ही फेसबुक आणि व्हॉटसअपवर 'आम्ही असू पु.ल.कित' या नावाने एक समूह तयार केला आहे. तुम्हाला सांगतो या समूहात विशी ते अगदी सत्तरीत असणारे सदस्य आहेत. काहीजण अनेक वर्षांपासून परदेशात राहतायत. बरेचसे कॉलेजात शिकत आहेत आणि प्रत्येकजण हा तुमच्या साहित्याचा आनंदभोगी आहे. 'हे डूड, हाय बेब्स' म्हणणारी पोरं ज्यावेळी अंतूशेट, नारायण, रावसाहेब वगैरे मंडळींबद्दल एकमेकांना टाळ्या देत दिलखुलास गप्पा मारताना पाहतो त्यावेळी जगाला ओरडून सांगावंसं वाटतं की नाही हो नाही, आम्ही बिघडलेलो नाही! अजूनही आम्हांला चांगल्या-वाईटाची जाण आहे. भाई, तुमच्या लेखणीने आमच्या मृतप्राय संवेदना जागृत केल्या. जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला शिकवलं. आमची नजर सौंदर्यासक्त बनली व जीवन समृद्ध झालं. आयुष्यातील दुःखांची काटेरी टोकं तुमच्या नर्मविनोदी कानशीने बोथट झाली आणि मनं अनैतिक विचारांनी रक्तबंबाळ होण्यापासून वाचली. याहून अधिक ते काय हवं? देवाला समजलं की आपल्या सगळ्याच लेकरांचं दुःख आपण स्वतः काही हलकं करू शकत नाही. मग त्याने तुमच्यासारखे दूत निर्माण केले आणि या मर्त्यलोकात पाठवले. याबद्दल त्या देवाचे मात्र मी आभार मानतो. आता इथेच थांबतो. बाकी तिकडच्यांची चैनी असणार! रंभा-उर्वशी वगैरे काळजी घेत असतीलच!!
जन्मदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा!

तुमचं अजाण नातवंड,
अमोल लोखंडे
७५८८०१९८८४
(या नंबरवर कॉल येतो. पूर्ण पत्ता दिला तर पाहूणे येतील.)

2 प्रतिक्रिया:

Unknown said...

खूप खूप आभार दीपकजी!

♫ ~ RhythM ~ ♫ said...

Khup sunder Amol...
Deepak...ata dar veli thanks vagare mhanana khupch formal hota...tarihi..!!