Thursday, December 18, 2014

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान - अनिल अवचट

"एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन."
- पु. ल. देशपांडे


एके दिवशी दुपारी एक तरूण मुलगा बेळगावहून आला. म्हणाला, "मी ड्रगपासून गेले चार दिवस दूर आहे. पण उद्या माझा इंटरव्ह्यू आहे. ही नोकरी लागली तर माझं सगळेच प्रश्न मिटतील..."

मी म्हणालो, "बरोबर आहे. पण यात मी काय करू शकतो?"

तो म्हणाला, "मला ड्रगची एक पुडी पाहिजे. ती मी खिशात ठेवीन. ओढणार नाही. पण ती नुस्ती खिशात असली तरी मला आधार वाटेल. तेवढी पुडी मला मिळवून द्या."

मी थक्क झालो. आजवर धीर येण्यासाठी खिशात अंगाऱ्याच्या पुड्या ठेवतात, हे ऐकले होते. म्हणालो, "मी आणि तुला पुडी मिळवून देऊ? आम्ही तुला यातनं बाहेर पडायला मदत करू. पण हे काय?"

"मला इथले ड्रग विकणारे माहीत नाहीत. बेळगावचे माहीत आहेत. म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही लेखात लिहिलेत, तुमच्या पोलिसांच्या ओळखी आहेत. त्यांनी पकडलेल्या मालातली एखादी पुडी काढून द्यायला सांगा की... "

मी मनातनं संतापलो, पण संयमाने म्हणालो, "तुला ड्रगमधनं बाहेर पडायचं असलं तर ये. नसलं तर चालू लाग!"

तो गयावया करून गेला अखेर. मी आणि सुनंदा सुन्न होऊन बसलो. पाच-दहा मिनिटांत एक गोरे, साठीचे, टक्कल पडलेले गृहस्थ दारात उभे. त्यांना आत बसवले. म्हणाले, "मी अमुक अमुक. (ते तिथल्या प्रसिध्द श्रीमंतांपैकी एक.) मघाशी आलेला माझा मुलगा. त्याला खरोखरीच एक पुडी मिळवून द्या. एक बाप म्हणून हात जोडून विनंती करतो."

आमचा हा धक्क्यावर धक्के खायचा दिवस होता. सुनंदाने त्यांना ड्रग सोडताना जो त्रास होतो तो कमी करण्याची औषधे लिहून दिली आणि त्यांना निरोप दिला. पुढे मुक्तांगण सुरू झाल्यावर तो मुलगा पेशंट म्हणून आला. ‘तेव्हा’ त्याचा इंटरव्ह्यू वगैरे काही नव्हता. त्याला पुडी मिळत नव्हती, त्रास सुरू झालेला, म्हणून तो आला होता. नंतर त्या कुटुंबाशी काही वेळा संबंध आला. श्रीमंती अफाट होती. पण त्या घरात संस्कृतीच नव्हती. घरात एकमेकांकडे संवाद नव्हता. प्रत्येकाची दिशा भलतीकडेच. या निमित्ताने एक असं घर आतून पाहायला मिळालं. काय नव्हतं तिथं? बंगला, वस्तू, गाड्या... पण काय होतं तिथं? शिकलोय त्यांच्याकडून, की नुसत्या पैशात सुख-समाधान नसतं. ते व्यक्त होतं आपापसातल्या हृदय नात्यांमध्ये, आपलं मागे ठेवून इतरांसाठी करण्यामध्ये. घराघरांतल्या सर्वांसाठी अखंड झिजणाऱ्या कित्येक आया आठवल्या. त्यातनं ती समाधानी घरं उभी राहिलेली. हे जागोजाग दिसतंय, तरी लोक पैशामागे धावताहेत, प्रॉपर्टीसाठी एकमेकांवर खटले भरून आयुष्यभर लढताहेत... काय म्हणावे याला?
                       
नंतर कधी तरी सुनीताबाईंचा फोन आला. नंतर पु.ल. ही बोलले. ते या लेखांनी खूप अस्वस्थ झाले होते. ‘भेटायला या दोघं’ असं म्हणाले. मग काय, आम्ही लगेच गेलोच त्यांच्या घरी. ते जवळच राहत. आमच्या दोघांचे त्यांच्याकडे बरेच जाणेयेणे असायचे. हक्काने काही बाहेरची कामेही सांगायचे. आम्ही त्यांची मुलेच जशी. मला दरवर्षी एकदा खास कामाला बोलावत. त्यांच्या ट्रस्टमधून ते काही छोट्या उपक्रमांना मदत करत. मी कुठून जाऊन आलो की त्या त्या वेळी एखाद्या कामाविषयी, ते करणाऱ्या माणसांविषयी सांगायचो. ते लक्षात ठेवून मला अधिक माहिती विचारून त्यांच्या गरजांची चर्चा करायचे. मग मी त्या व्यक्तींना बोलावून घ्यायचो. असे बऱ्याचदा.

या वेळी त्यांनी बोलावले आणि म्हटले, "या मुलांसाठी काही तरी करा तुम्ही. आत्ता एक लाख द्यायचे ठरवलेय, पण आम्ही पैशाला कमी पडू देणार नाही." हे दोघे तोपर्यंत चालू असलेल्या, स्थिरावलेल्या कामांना मदत करीत आलेले. इथे कामाचा पत्ताही नव्हता. तरी एक लाख? बाप रे, केवढी मोठी रक्कम! काय करू यात? प्रचारासाठी पुस्तिका काढता येतील. हजारो हँडबिले छापू. किंवा एखादा फोटोंचा स्लाइड शो करता येईल. अधिक पैसे जमवून अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी? तेवढ्यात सुनंदा म्हणाली, "या लोकांसाठी आपण व्यसनमुक्ती केंद्र काढू." मी थक्क झालो. एवढा मोठा घाट घालायचा? बाप रे! पण पु.ल., सुनीताबाईंनी ती कल्पना उचलून धरली. परत येताना मी सुनंदाला म्हटलं, "अगं, असं का म्हणालीस तू? आपल्याला झेपणार आहे का हे?"

"झेपेल की."

"पण असं एकही केंद्र आपण पाहिलेलं नाही. त्या शास्त्रामधलं कसलं ट्रेनिंग घेतलेलं नाही..."
तशी सुनंदा सायकियाट्रिस्ट असल्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये चरस-गांजामुळे वेडे झालेले किंवा दारूमुळे अल्कोहोलिक सायकोसिसचे पेशंट तिने पाहिलेले होते. पण ते काही झाले तरी मेंटल पेशंट होते. इथं तसं नव्हतं. ते बाकीच्या दृष्टीने नॉर्मल होते. त्यांना कसं हाताळायचं?

त्यावर सुनंदा जे म्हणाली त्यानं मला तिचं वेगळंच दर्शन झालं. ती म्हणाली, "त्यात काय? निदान या पेशंटला ठेवायला जागा तर होईल! आणि नंतर शिकू आपण पेशंटकडनंच." तिच्यात ज्ञानाचा, डिग्रीचा कसलाही अहंकार नव्हता. ‘आय नो एव्हरीथिंग’ ही बहुतेक उच्चशिक्षितांची वृत्ती तिच्यात औषधालाही नव्हती. कुणाकडनं शिकायचं, तर पेशंटकडनं? त्या दारूड्या, गर्दुल्ल्यांकडनं?

पण सुनंदा खरेच त्यांच्याकडून शिकत गेली. ती विचारायची पेशंटला, की तुझ्यासाठी काय झालं तर तू बरा होशील. नेहमी पेशंटकडून ती विचार करायला सुरुवात करायची. त्यामुळे पेशंट तिच्याशी जोडलेच जायचे. आणि हे पेशंटकडून शिकणं आमचं आजतागायत चालू आहे. हजारो पेशंट पाहिलेत तरी. अशी ही सुनंदा!

केंद्र काढायची कल्पना पुलं-सुनीताबाईंनी लगेच उचलून धरली. सुनंदा त्या वेळी मेटंलमध्ये सीनियर सायकियाट्रिस्ट होती. तिचे अधीक्षक डॉ. इक्बाल हजच्या यात्रेसाठी सहा महिन्यांच्या रजेवर गेले होते. तेव्हा त्यांचा चार्ज सुनंदाकडे असायचा. (सुनंदाला अधीक्षक होण्याबद्दल अनेकदा विचारले होते; पण तिला क्लिनिकल कामाची आवड असल्याने तिने नकार दिला होता.) अलीकडच्या काळात दोन मोठ्या इमारती ‘मेंटल’च्या आवारात बांधल्या गेल्या होत्या. एकीमध्ये सर्व ऑफिसेस हलली, पण दुसरी तशीच काही वर्षे रिकामी पडून होती. तळमजल्यावर काही पेशंट होते. ते पण सुनंदाने दुसरीकडे हलवले आणि या कामासाठी या इमारतीची सरकारकडे मागणी केली. सरकारने मेंटल हॉस्पिटलच्या आवारात मेंटल हॉस्पिटलतर्फे हे केंद्र चालवावे, अशी त्या प्रयत्‍नांची दिशा होती. सरकार त्या वेळी आर्थिक अडचणीत असावे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी झीरो बजेट मांडलेले होते. म्हणजे नेहमीचा खर्च चालू राहणार; पण नव्या योजना, उपक्रम यावर जशी बंदीच. कुठेही काहीही प्रयत्‍न करायचा, तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा परवलीचा शब्द होता, झीरो बजेट. म्हणजे पुढे रस्ता बंद. अशा परिस्थितीत सरकारकडनं नकार अपेक्षित होता. पण पु. लं.चं नाव, सुनंदाच्या डॉ. संभाजी देशमुख या सहकाऱ्याने मुंबईला जाऊन केलेले निकराचे प्रयत्‍न यामुळे त्या खडकाला हळूहळू चिरा पडू लागल्या. संभाजी हा अत्यंत सरळमार्गी, सालस, शांत डॉक्टर. बाकी सगळे पांगले तरी हा तिच्या मागे ठाम उभा होता. आता तोही जगात नाही. मग सरकारने असा तडजोडीचा मसुदा पाठवला, की जागा वापरा, पण नोकरवर्ग तुमचा. त्यांचा पगारही तुम्ही करायचा. त्यांनी नंतरही सरकारी नोकरीवर हक्क सांगता कामा नये. वगैरे वगैरे.

परत प्रश्न आला : पु.लं.ची देणगी स्वीकारायला आमची संस्था कुठेय? ते कोणाला पैसे देणार? आणि तिथे पैसे खर्च कोण करणार? पु.लं.चे ‘पु ल देशपांडे प्रतिष्ठान’ होते. पण त्यांचे काम म्हणजे योग्य त्या संस्थेला मदत करायची आणि नामानिराळे व्हायचे. देणगी देताना ते खूप कसोशीने माहिती घेत, पण नंतर त्यांची अजिबात ढवळाढवळ नसे. ही त्यांनी घालून ठेवलेली मर्यादा योग्यच होती. हा एक चांगला, हितचिंतकाचा रोल होता. पण आमच्या बाबतीत ते जरा जास्तच गुंतले होते. सुनीताबाई म्हणाल्या, "तुम्ही संस्था स्थापन करण्याची प्रोसेस सुरू करा. तोपर्यंत तुम्ही नेमाल त्या माणसांचे पगार, इतर व्यवहार आमच्या ट्रस्टतर्फे करू."

हे ऐकून मी चकितच झालो. त्यांच्या संस्थेच्या मार्फत? किती कटकट होईल त्यांच्या डोक्याला! पण त्यांनी पत्करले. पुढे मुक्तांगणचा सेवकवर्ग वाढत गेला. त्यांचे पगाराचे चेक पु.ल. फाउंडेशनमार्फत दिले जायचे. ती नावे, त्या रकमा लिहून सुनीताबाई तयार ठेवायच्या. मग त्या दोघांच्या सह्या व्हायच्या. दर महिन्याला हा सोपस्कार. 

सुनंदाने ती बिल्डींग साफ करून घेतली. मी अ‍ॅल्युमिनियमची जाड, पिवळ्या रंगाची मुक्तांगणाची अक्षरे करून घेतली. संडास, ड्रेनेज लाइन्स... सगळेच साफ करून घ्यावे लागले. सुनंदाला मेंटलमधला कर्मचारीवर्ग फार मानत असे. इलेक्ट्रिशियनने सडलेले वायरिंग काढून नवे बसवले. काही कर्मचारी आले आणि त्यांनी जमेल तिथे, जमेल तसा सरकारी रंग लावून टाकला. फरशा इतक्या काळ्या झाल्या होत्या, की त्यांनी अ‍ॅसिड टाकून धुतल्या तेव्हा त्यांचा मूळ रंग हळूहळू दिसू लागला. तिच्या आवडत्या नर्सेस तिने इकडे घेतल्या. त्यांनी औषधांची खोली सजवली, तपासणीची खोली तयार केली. सुनंदाच्या ऑफिसवर हॉस्पिटलच्या पेंटरने पाटी करून लावली. हे सगळे कर्मचारी इतर डॉक्टरांच्या, अधिकाऱ्यांच्या मते ‘नाठाळ’ होते, पण सुनंदाच्या हाताखाली कसे ते धावून धावून काम करीत. 
                         
सुनंदाला मेंटलमधल्या गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव होता. जसा पेशंटबाबतचा क्लिनिकल अनुभव होता, तसाच तिला ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चाही अनुभव होता. तिने पेशंट आल्या आल्या नोंदवतात त्या रजिस्टरपासून ते केसपेपरपर्यंत, औषधांचे स्टॉक रजिस्टर, रोज किती गोळ्या कुणाकुणाला दिल्या याची हिशोब वही, मेंटलमधून किती कॉट-गाद्या-चादरी-फर्निचर आणले त्याचे डेड स्टॉक रजिस्टर... अशी बहुविध तयारी केली. सरकारी यंत्रणेला आपण किती गलथान समजत असलो, तरी प्रत्येक गोळीचा, प्रत्येक उशीच्या अभ्याचाही हिशोब ठेवणारी ती एक अजब यंत्रणा आहे, हे या निमित्ताने समजले. त्यात गैरव्यवहार करणारे असोत, हलगर्जीपणा करणारे असोत; पण त्या सिस्टीमच्या मला दाद द्यावीच लागली.

पु.लं.च्याकडे त्या काळात जवळपास रोज बैठका होत. या केंद्राला नाव काय द्यायचे? सुनीताबाईंची सूचना होती, की ‘तुमच्या मनात दुसरे काही नाव नसले, तर आम्ही ज्या उपक्रमांना देणगी दिली तिथे मुक्तांगण हे नाव सुचवतो. भाईंच ते आवडतं नाव आहे.’ आम्ही लगेच ते उचलून धरले. मग पु. ल. म्हणाले, "मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ असं नाव दिलं तर?" वा: वा: म्हणून ते नाव नक्की झाले.

सर्व तयारी झाल्यावर उद्‍घाटनाचा दिवस ठरवला. २९ ऑगस्ट १९८६. डॉ. ह. वि. सरदेसाईंच्या हस्ते उद्‍घाटन करायचे ठरवले. पु.लं.च्या नावामुळे, फोनवर सगळेजण होकारच देत. बाबा आमटे त्या दिवशी पुण्यात होते. ते तर आपण होऊन या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला आले. असा पाहुणा प्रयत्‍न करूनही मिळाला नसता, तो आम्हाला आपोआप मिळाला!

या सगळ्या गडबडीत मी मात्र आतून जरा हादरलोच होतो. माझी मूलभूत शंका अशी, की आपल्या या केंद्रात कोण येणार? त्यांनी, म्हणजे अशा व्यसनी माणसांनी आपल्याकडे का यावे? एक तर अशी किती माणसे व्यसने सोडायला तयार होतील? आनंदकडे असा उपक्रम पाहिला होता. पण तो मुंबईच्या के.ई.एम.सारख्या मोठ्या, जुन्या हॉस्पिटलच्या भाग होता. त्यातही त्यांना सायकियाट्री वॉर्डमधली जेमतेम साताठ बेड्‍स दिलेली. मुंबईत माहिती घेताना बऱ्याचजणांकडून कळले, की जे. जे. हॉस्पिटलने असे केंद्र सुरु केले आहे. ठाणे मेंटलमध्येही अशा केंद्राचे उद्‍घाटन सुनील दत्त यांच्या हस्ते झाले. पण ही दोन्ही केंद्रे बंद पडली. जे. जे. मध्ये दारू सोडण्यासाठी दाखल झालेल्या पेशंटना तिथले वॉर्डबॉईजच दारू पुरवायचे. कुठल्या मार्गाने? तर शहाळ्यात दारू भरून आणून द्यायचे आणि पेशंट डॉक्टरसमोर स्ट्रॉने दारू पीत असत! ठाण्यालासुध्दा असले घोटाळे झाले. जे ऐकत होतो त्यावरून निष्कर्ष एकच होता, या क्षेत्रातल्या संस्थांच्या मृत्युदर फार म्हणजे फारच मोठा आहे. थोडक्यात, जगलेलं पोर समोर कोणी दिसतच नव्हतं. बंद पडण्याचं उघड कारण म्हणजे पेशंट अ‍ॅडमिट असताना त्यांना दारू किंवा ड्रग्ज मिळणे हे. जी केंद्रे बंद पडली ती सरकारी हॉस्पिटलमध्ये होती. तिथल्या स्टाफविषयी कोण गॅरंटी घेणार? त्यांच्यातच व्यसन इतके बोकाळलेले, की दारूच्या बदल्यात कुठलेही काम करायला बरेचजण तयार.

मग इथे तरी काय होतं? मेंटलचा स्टाफ कही वेगळा नव्हता. तो याच भ्रष्ट समाजाचा भाग होता. मग कसं चालणार, कसं टिकणार हे केंद्र? आपल्या यंत्रणेला एक माणूस जरी अप्रामाणिक असेल तर सगळा प्रोग्रॅम कोसळतोच. इथे ‘ऑल ऑर नन लॉ’असतो. इथे एक तर संस्था चांगली चालेल, नाही तर पूर्ण बंद पडेल. मधली अवस्था नाही. सुनंदाने घाट घातलाय खरा, पण ती यतून कशी वाट काढणार? मी तिचा निष्ठावंत सहायक. जरी केंद्राची सुरूवात व्हायला माझे लिखाण कारणीभूत झालेले असले, तरी हे केंद्र म्हणजे पूर्णपणे तिचेच अपत्य होते. तोपर्यंत मी अनेक प्रश्नांवर लिहिले होते, पण त्या प्रश्नांसाठी कुठल्या कामात मी कधी स्वत:ला गुंतवून घेतले नाही. यावर काहीजण टीकाही करीत. मी त्यांना सांगायचो, तो माझा स्वभाव नाही. पण इथे माझ्या लिखाणानंतर सुनंदामुळे मी या कामातही गुंतत गेलो. यापूर्वी मी युक्रांदमध्ये होतो. बाबा आढावांबरोबर महात्मा फुले प्रतिष्ठानमध्ये होतो. पण तिथे इतर अनेक जण होते, त्यातला मी एक होतो. तिथेही मी फार गुंतायचो नाही. आंदोलनात इतरांबरोबर भाग घ्यायचो. तुरंगावासही पत्करायचो. पण लोक म्हणायचे तसे एका जागी जेठा मारून बसून काम केले नव्हते. आणि इथे तर सुनंदामुळे ते सगळे करणे भागच होते. पण तेवढ्यातही माझा असा हिशोब होत, की सुरवातीला माझी मदत लागेल, पुढे मला त्यातून बाहेर पडता येईल. त्याकाळात आमच्या कुठल्याशा वाढदिवसाला मी सिंहगडावर सुनंदाला एक ‘प्रेझेंट’ दिले. म्हणालो, "चल, तुझ्या या कामाला माझी दोन वर्षे देतो. या काळात मी माझे असे काही काम करणार नाही. तुला सर्व कामांना उपलब्ध राहीन." ती दोन वर्षे कधीच संपली. त्यानंतर तेवीस वर्षे लोटलीत. मला अजून त्यातून बाहेर पडता आले नाही.

कार्यक्रमाच्या दिवशी ‘सकाळ’मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला. ‘मुक्तांगण’च्या इमारतीच्या फोटोसह. त्यात असे असे केंद्र सुरू होणार आहे, वगैरे काही लिहिले असावे. त्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाची माहितीही दिली असावी. माझ्या मते शहरापासून इतक्या लांब या सभेला कितीसे लोक जमतील? पण तिथेही धक्काच. आमच्या मेंटलचा ‘रिक्रिएशन हॉल’ भरूनच गेला. बाबा आमटे स्टेजकडे तोंड करून एका खाटेवर पहुडले होते. सस्मित नजरेने कार्यक्रम पाहत, ऐकत होते. आनंदचे सुरेख सभा नियोजन आठवते. सभेत कोण काय बोलले ते आठवत नाही, पण सुनंदा अतिशय नेटकी आणि छान बोलली, ती कधी सभांमध्ये भाषण करीत नसे. तसा तो भाग माझावर सोपवलेला असे. पुढे मुक्तांगणची वाढ झाल्यावर तिने स्टेजवर जाणे सोडलेच. आमच्या संस्थेच्या वाढदिवस कार्यक्रमात, किंवा २६ जूनच्या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमात ती मलाच स्टेजवर बसायला भाग पाडायची, आणि मला ती वरून समोर प्रेक्षकांमध्ये-म्हणजे आमचे पेशंट, त्यांच्या बायकांमध्ये बसलेली दिसतात. त्या पहिल्या कार्यक्रमात मात्र ती छान बोलली. बहुधा खादीचा गुरुशर्ट, सलवार आणि वर जाकीट घातलेलं असावं. पण नक्की आठवत नाही. या स्मृतीची गंमत बघा... त्याआधीचे, नंतरचे प्रसंग मला जसेच्या तसे आठवतात, पण टेपचा तेवढाच भाग खराब व्हावा? नंतर दुसऱ्या दिवशी पु.लं.चे मित्र नंदा नारळकर यांनी पुलंना म्हटलेलं लख्ख आठवतंय, की ‘काय ती मुलगी छान बोलली! केवढा आत्मविश्वास होता तिच्या बोलण्यात.’
                           
पु.ल.- सुनीताबाईंनी तेव्हा आमच्यावर धरलेली छत्री नंतर ही बराच काळ तशीच धरून ठेवलेली होती. या छत्रीचे वैशिष्ट्य असे की, त्यातून मायेच्या, प्रेमाच्या धारा थेट आमच्यावर पडत असत. नंतर सरकारने हे केंद्र ‘टेक-ओव्हर’ करावे, पण त्याला यश येत नव्हते. कारण सरकारचे ‘झीरो बजेट’. (त्यात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असावेत. पु.लं.ना ते ओळखत होते की नाही याची शंका.) दर महिन्याला दहा-पंधराजणांच्या पगाराचे चेक्स सुनीताबाई सुनंदाने दिलेल्या यादीप्रमाणे लिहून तयार ठेवत. मग पु.ल. त्यावर सह्या करीत बसत. त्यांना हा त्रास द्यावा लागतो याचे वाईट वाटे; पण करणार काय? अखेरीस त्यांनी दिलेली एक लाखाची देणगी संपत आली. आम्ही चिंताग्रस्त झालो. पण पु.लं.नी सांगितले, "जिवात जीव असेतोवर हे केंद्र मी बंद पडू देणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे काम करा." काय या शब्दांनी आधार वाटला असेल आमच्या सगळ्या टीमला! तरीही मी प्रयत्न करत राहिलो. आणि केंद्र सरकारची आम्हाला ग्रँट मिळाली. ती आनंदाची बातमी सांगायला पु.लं.कडे गेलो. तोवर त्यांनी आणखी सुमारे अडीच लाख रुपये दिलेले होते. तरीही ते म्हणाले, "मला आता जाता जाता मुक्तांगणसाठी काही तरी द्यायचेय. काय देऊ?" सुनंदाने सांगितले, "मुलांना मोकळ्या वेळेत वाचनाची आवड लावायचीय." पु.ल. म्हणाले, "लायब्ररीची कपाटं मी देतो." शेजारी बसलेल्या नंदा नारळकरांनी पुस्तक खरेदीसाठी पाच हजार रुपये दिले. कपाटाचं बिल पस्तीस हजार रुपये झालं, ते पु.ल.-सुनीताबाईंनी दिलं. तरीही ऋणानुबंध राहिलेच.

२९ ऑगस्टच्या वर्धापनदिनाला ते आवर्जून यायचे. पेशंट मित्रांचे, कुटुंबीयांचे अनुभव ऐकताना ते गलबलून जायचे. एका पेशंटची मुलगी बोलताना तर त्यांचे डोळे डबडबले होते. परत येताना गाडीत म्हणत होते, "त्या पोरांनी काय पाप केलंय रे, त्यांना असं लहानपण मिळावं?" एका पेशंटचे सासरे सभेत उठून म्हणाले, "पु.ल स्वत: पद्मश्री आहेत. त्यांनी आमच्या मॅडमना पद्मश्री मिळवून द्यावी." त्यावर पु.ल. म्हणाले, "हजारो माणसांनी तिला आई मानलंय. आईपेक्षा जगात कोणती पदवी मोठी आहे?" असे काही क्षण...

पुस्तक - ’मुक्‍तांगणची गोष्ट’
लेखक - अनिल अवचट
मुळ स्त्रोत - www.pldeshpande.com/social_worker_muktangan.aspx

1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

very goog