Friday, December 12, 2014

एका खेळियाची किमया - निशिकांत जोशी

मराठी भाषेत आधुनिक काळात दोन अष्टपैलू कलावंताना जवळून पाहण्याचे भाग्य लाभले्ल्या पिढीला निश्चितच आपण एका समृद्ध काळात जगलो याचा आनंद वाटेल. १९५० ते २००० हा काळ अनेक क्षेत्रात मोठ्या माणसांच्या कर्तृत्वानं झळाळणारा! त्यात चित्रपटांमध्ये बिमल रॉय, सत्यजित रे, गुरुदत्त, गिरिश कर्नाड आणि श्याम बेनेगल, चित्रकलेमध्ये गायतोंडे, जेमिनी रॉय, रामकिंकर, सुधीर पटवर्धन, हुसेन आणि भूपेन कक्कर, मोहन सामंत, संगीतात अमीरखाँ, पं कुमार गंधर्व, रवी शंकर, अलि अकबर खाँ, धोंडुताई कुलकर्णी, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरसिया, अल्लारखाँ आणि त्यांचे चिरंजीव झाकीर हुसेन लता मंगेशकर आणि आशा भोसले, क्रिकेटमध्ये सुनिल गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर अशी कितीतरी नावे पुढे येतात. या सार्‍या कलावंतानी निर्माण केलेल्या महान कलाविश्वाचा अनुभव आणि आस्वाद कसा घ्यावा याची दृष्टी लाभलेले काही रसिक होऊन गेले. त्यांच्या विशाल रसिकत्वाची छाया आपल्याला लाभली आणि त्यांची कलादेखील आपण पाहिली आणि स्तिमित झालो. त्या रसिकांमध्ये गणना होते ती आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपडे यांची! या दोन रसिकाग्रणीनी महाराष्ट्राची अभिरुची घडविली. त्यानी अभिजात साहित्य, कला आणि आधुनिक समाज यांचा संगम साधला.आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे याना आपण केवळ विनोदी लेखक म्हणून पाहतो. पण तो त्यांच्या असंख्य गुणांपैकी केवळ एक गुण झाला. त्या दोघानी साहित्य, चित्रपट, नाटक या कलांच्या प्रांतात विलक्षण समृद्ध कामगिरी केली.

पु. ल. देशपांडे यांचे निधन झाले १२ जून २००० रोजी. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रसिकाना त्यांची आठवण आली आणि त्यांच्या अनेक कलाकृती आठवल्या खर्‍या. पण असेही एक पु.ल. होते की जे सामाजिक समस्यांचं सखोल चिंतन करीत असत. आणि त्याबाबत मार्मिक विचार मांडत असत. एक शून्य मी या आपल्या पुस्तकातील एका लेखात त्यानी मांडलेले विचार सार्‍या समाजाला प्रेरणा देणारे आहेत . त्यानी म्हटले आहे की, एकतर धर्म, ईश्वर, पूजापाठ, यात मला कधी रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य पाहून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडला नाही. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही.देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यानी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला तिळमात्र शंका राहिलेली नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते, तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. या लेखकाची मनोधारणा ही बुद्धीवादी होती. त्यांच्या साहित्याद्वारे त्यानी मानवी जीवनातील जे जे उत्तम उदात्त उन्नत त्याचा आग्रह धरला. तर सदैव सामाजिक समतेच्या बाजूने राहिले. त्यानी सदोदित व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याचा आग्रह धरला. त्यानी मानवतावाद आणि शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचे काम सर्वात महत्वाचे मानले. त्यानी आपल्या लेखनाद्वारे ज्या मूलभूत अशा जीवनदृष्टीचा आग्रह धरला त्यात त्यानी केवळ मनोरंजन केले नाही. त्यानी एक समृद्ध जीवनदृष्टी दिली. जीवनाचा, सौदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा याची दृष्टी दिली. जीवनात खळखळून वाहणारा आनंदाचा निर्झर असे त्यांचे साहित्य आहे. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य हे मध्यमवर्गीय जाणिवांचे कुंपण असलेले आहे अशी टीका त्याचे काही समकालीन आणि नंतरचे समीक्षक करीत आले आहेत. पण त्यानी जे विविधांगी जीवनदर्शन घडविले आणि त्यातून जी जीवनदृष्टी व्यक्त केली तशी अन्य कोणाकडे क्वचितच दिसते.

विदूषक हा एक अत्यंत गंभीरपणे जीवनाकडे पाहणारा कलावंत तत्वज्ञ मानला जातो. तो अत्यंत सखोल चिंतन आपल्या विनोदी मुखवट्याच्या आडून सांगत असतो. पु.ल.देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या बाबतीत तर सर्वार्थाने खरे आहे. त्यानी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांची विनोदाचा परंपरा पुढे चालविताना अभिजात विनोद निर्माण केला आहे. पु. ल. देशपांडे याना केवळ मध्यम वर्गिय जीवनाच्या वर्तुळात बसविणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यानी रवींद्र साहित्य, संगीतापासून कुमार गंधर्वाच्या सूफी संगीतापर्यंत, निर्गुणी भजनापर्यंत, त्यांच्या संगितातील प्रयोगांपर्यंत सारे कलाजीवन समरसून अनुभवले. बालगंधर्वांच्या काळातील संगीत नाटकांचा अत्यंत समृद्ध असा काळ अनुभवला. गुरुदेव रवीद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये राहून त्यानी तेथील कलासाधना आणि शिक्षणाचा अनुभव घेतला. त्यानी बाबा आमटे यानी घनदाट जंगलात कुष्ठ रोग्याना नेऊन त्याच्या पुनर्वसनाचे काम करताना कुष्ठ रोग्यांच्या श्रमातून फुलविलेल्या आनंदवनाच्या प्रतिसृष्टीमध्ये तर रमले. तेथे त्याना मानवतावादाचा प्रकाश दिसला. ते दलितांची वेदना व्यक्त करणार्‍या साहित्याशी एकरूप झाले आणि तो विद्रोह ज्या विषमतेच्या विरोधात होता त्या विषमतेच्याविरोधात चाललेल्या लढ्यामध्ये ते सहभागी झाले.

त्यानी मराठीवर खूप प्रेम केले आणि त्या भाषेतील सर्व बोलीभाषा त्यानी आपल्या मानल्या. संगीत नाटके भरात होती तो मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ जो होता त्याचे सर्व नजाकतीसह दर्शन घडविताना त्यानी मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक संचित जोपासले. पु. ल. याना एक खेळिया मानले जाते. कारण ते एक श्रेष्ठ परफॉर्मर होते. त्यांच्या लेखनात शिल्प, चित्र,संगीत, अभिजात साहित्य, तत्वज्ञान,नाटक, अशा सार्‍या क्षेत्रांविषयी सृजनशील चिंतन खेळकरपणे मांडले आहे. त्यानी गुळाचा गणपती या चित्रपटात पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय आदि सबकुछ पु. ल असा कार्यक्रम केला. दूधभात, नवरा बायको, देवबाप्पा आदि चित्रपटांमध्ये त्यानी भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयाचा अत्यंत प्रसन्न आविष्कार वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वावटळ अशा कार्यक्रमांमधून सादर झाला. चित्रपटांमध्ये तो अभिनय रसिकाना भुरळ घालत होता. त्यानी केलेले व्यक्ति आणि वल्ली, गणगोत असे व्यक्तिचित्रणात्मक लेखन हे त्या प्रकारच्या लेखनात अजरामर झाले. पु.ल. देशपांडे यांची सहृदय जीवनदृष्टी त्यातून व्यक्त झाली आहे. त्यांच्या साहित्यात दुसर्‍या महायुद्धानंतर महाराष्ट्रात झपाटयाने उ्दयाला आलेल्या मध्यमवर्गाच्या सार्‍या संवेदना आहेत आणि त्या वर्गाचे कमालीचे जिवंत चित्रण आहे.पण त्यापुरतेच पु.ल. मर्यादित नाहीत. त्यानी जीवनाच्या सर्व क्षेत्राना स्पर्श करणारे लिहिले तरी किंवा त्यात सहभागी तरी झाले. आणीबाणीच्या विरोधात त्यानी ठाम भूमिका घेतली पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीत ते अडकले नाहीत. त्यानी आपल्या लेखनातून एक मूल्यविवेक मात्र जागा केला. तो मूल्य विवेक आहे मानवतावादाचा, समतेचा, सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्याचा. आविष्कार स्वातंत्र्याचा आणि अभिजात सौदर्यदृष्टी जोपासण्याचा. त्यांचे एकूणच जगण्यावर विलक्षण प्रेम होते. जीवन हे सौदर्याचं दर्शन घेण्यासाठी आहे, सौदर्याचा उत्सव पाहण्यासाठी आहे ही त्यांची धारणा होती. त्यानी जे सौदर्य अनुभवले त्याचे दर्शन त्यानी सार्‍या वाचकाना घडविले. निखळ आनंद दिला. जीवनातील आनंदाचा आस्वाद कसा घ्यावा हे त्यानी दाखविले.

रविवार १५ जून २०१४
निशिकांत जोशी
दैनिक सागर

0 प्रतिक्रिया: