Tuesday, April 9, 2013

तुम्हाला नागपूरकर व्हायचं का?

 ...आता तुम्हाला नागपूरकर व्हायचं का? हि तुमची महत्त्वाकांक्षा पार पाडणं अत्यंत सोप्पंय.त्यासाठी एकच अट आहे,म्हणजे तुम्ही नागपुरात राहून चालणार नाही.खरा नागपूरकर हा नागपुरात 'नागपुरी खाक्या' दाखवूच शकत नाही कारण तिथे सगळेच खाक्या दाखवायलाच उत्सुक तर ह्याचा खाक्या कोण बघणार?

जर पुण्या-मुंबईत राहिलात तरच नागपुरी खाक्या दाखवणं शक्य आहे.आपण नागपुरी आहोत एवढं नुसतं ऐकवीत राहायचं बास..हे मुख्य काम.मग ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेनी नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची. पानामध्ये कितीही अस्सल तूप पडलेलं असलं तरी वर्‍हाडी तूप या विषयावरती बोलावं.बिर्याणी खातानासुद्धा 'वडाभाताचा मजा काही और आहे' हे सांगाव.अगदी गुलाबी थंडी जरी पडलेली असली तरी 'नागपुरी उन्हाळा..अरे काय,नागपुरी उन्हाळा...ती संत्री..ते जाळ्याचे पडदे...वगैरे वगैरे' ते ऐकणार्याला त्या थंडीत घाम फुटेपर्यंत ते ऐकवत राहा.हे सगळं नागपूर शहरापासून आपण किमान  २०० मैल दूर आहोत हे ध्यानात ठेवून. खुद्द नागपुरात असलं काही बोललात तर ''चूप बे,का उगाच फजूल फुक्या मारून राहिला बे?'' असं लगेच ते विचारतील मग गोंधळ.

नागपूर बाहेरचा माणूस हा रत्नागिरीचा किंवा धुळ्याचा जरी असला तरी त्याला ''तुमच्या पुण्या मुंबईच्या लोकांचा..'' अशा तुकड्यानीच त्या वाक्याला सुरुवात करावी नेहमी.सतत कुणीतरी आपल्याला उपेक्षेनी मारुल राहिलेलं आहे हि भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण स्वतः पाहुण्याला जरी नुसतं कपभर चहा सरकवत असलो ना तरी सुद्धा बोलताना ''तुमच्या पुण्या-मुंबईमध्ये काय बेटी कंजुषी...चहा घ्या..''

किंबहुना नागपुराखेरीज इतर कुठेच खाण्यापिण्याचा शौकच नसतो असा सिद्धांत उराशी बाळगावा.मात्र पदार्थांचा फार तपशील देऊ नका. एखादा गोवेकर नुसत्या बांगड्याचे वीस प्रकार सांगेल आणि तुमच्या वडाभातापुढे तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे पंचाईत सगळी.अशा वेळेला आपली गाडी संत्री किवा कापूस ह्याच्यावर आणावी.कारण अस्सल मुंबईकर हा संत्र हे एरंडेलाबरोबर खायचं फळ आहे असं मानतो आणि कापूस हा गादीतच तयार होतो आणि आतल्या आत वाढायला लागून एखाद दिवशी गादी फोडून बाहेर येतो अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे.
           
अहो प्रत्येक शहरातल्या माणसांचे मोर्चे बांधण्याच्या काय जागा आहेत ते नीट तपासून पाहिलं पाहिजे. मुंबईत तुम्हाला 'आपण नागपूरकर आहोत' हे ठासवायचं असेल ना तर समोरचा माणूस हा नाडकर्णी का धुरंधर आडनावाचा आहे याची खात्री करा आणि सरळ नागपुरी हिंदीच सुरु करा. कारण अस्सल मुंबईकर भुताला भीत नाही इतका हिंदीला भितो. कारण अस्सल नागपूरकर मराठी माणसाची मातृभाषा जशी हिंदी आहे तशी अस्सल मुंबईकर मराठी माणसाची मातृभाषा हि इंग्लिश आहे. मात्र त्या इंग्लिशचा आणि इंग्लंडमधल्या इंग्लिशचा काही संबंध नाही हा. पुण्यातली इंग्रजी मात्र मुळा-मुठेच्या काठी जन्मास येऊन ओंकारेश्वारास तिचे दहन झाले. नागपूरला इंग्रजीची फिकीर करायचं काहीही कारण नाही कारण एका भाषाशास्त्रज्ञाच्या मते पुण्याची इंग्रजी हि संस्कृतोद्भव आहे,नागपूरची हिंदी हि मराठोद्भव आहे आणि मुंबईची मराठी हि आंग्लोद्भव आहे,भाषाशास्त्राचं मत आहे.

आता नागपूरकर होण्यासाठी पान खाणं आवश्यक आहे हि समजूत चुकीची आहे. पान सगळेच खातात,पण आपला नागपुरी अस्सलपणा दाखवायचा असेल तर ज्या पुणेकर किंवा मुंबईकराकडे तुम्ही पाहुणे म्हणून जाणार असाल ना त्याच्या घरी पानाचा इंतेजाम नाही याची खात्री करून ''पान नाही का?'' असं विचारून टाकावं. म्हणजे तो ओशाळतो.आपला एक पॉइंट सर झाला मग ''ठेल्यावरून बोलावून घ्या ना बे''. त्याला ठेला कळत नाही आणि कोणाला बोलवायचं ते कळत नाही. तो ओशाळतो म्हणजे दुसरा पॉइंट सर झाला. ''नाई का? मग थोडी सुपारी तर देऊन द्या ना.'' असं म्हटल्याबरोबर तो मसाल्याची सुपारी आणतो लगेच ''हट, हि मसाल्याची सुपारी, हि तर आमच्या नागपुराटली पोट्टी-पाट्टीही खात नाहीत हो,काय हे?'' पुन्हा आउट तो आणि इथून त्यातून एखाद्यानी पान मागवलंच तर मग सरळ खिडकीतून जोरदार पिंक खाली टाकावी. खालच्या भाडेकरूची झालीच रंगपंचमी तर आपण गेल्यावर शिमगा होईल. आपण निश्चिंत असावं आपलं नागपुरीपण सिद्ध झाल्याशी कारण. पण वरून कितीही उद्धटपणा केला तरी आतून मात्र आपण उदार असल्याचा भाव हा चालू ठेवायला पाहिजे. त्यासाठी मुंबईत कोणाही मुंबईकराच्या घरी गेलात आणि तुम्हीही रिटायर होई पर्यंत आणि त्यानंतरही मुंबईतच राहणार असलात तरी ''एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना,संत्र्याच्या सीजनला,अरे काय मस्त संत्रे खाऊ,वाळ्या-बिळ्याचे तट्टे-बिट्टे लावून पडले राहू आरामात,आमचा वर्हाडी पाहुणचार तर बघा''. असं आमंत्रण देत जावं. आता मुंबई ते नागपूर प्रवासखर्च जमेला धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात त्यामुळे ह्या आमंत्रणाचा कोणीही स्वीकार करत नाही काळजी नसावी.

असो ह्या विषयीचे आमचे पुस्तक लिहून तयार आहे पण त्याचे प्रकाशन मुंबईकराकडून कि पुणेकराकडून कि नागपूरकराकडून करावे हा क्रायसिस आमच्या पुढे आहे.

- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)
 श्री. वेदांत पोफळे यांनी हा लेख ’पु.ल.प्रेम’साठी पाठवल्याबद्दल त्यांचे आभार.

0 प्रतिक्रिया: