Thursday, November 8, 2012

एक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून

प्रिय पु.ल.,
द्वारा देवबाप्पा

१२ जूनचा तो अशुभ दिवस. दुपारी एक बावीसला आपली प्राणज्योत मालवली. उभा महाराष्ट्र पोरका झाला.
८ नोव्हेंबर १९७९ रोजी आपला साठावा वाढदिवस होता. या शुभदिनी 'रुपाली' ला स्नेहजत्रेचे रूप आले होते.

'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे' या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपण उदंड धन जमा केले व जे लोक तळमळीने व स्वच्छ हातानी चांगली कामे करतात अशांना आपण मुक्त हस्ताने देणग्या दिल्या.

दानात समाधान मानणाऱ्या आपल्या लोभस व्यक्तीमत्वाबद्दल काय लिहिणार ?

१३ जून २००० पासून वर्तमानपत्रांनी आपली स्तुती केली. ' माणसातला साहित्यिक ', 'साहित्यीकातला माणूस', 'असा शब्दगंधर्व न होणे' ,' पुरुषोत्तमाय नम:' असे अनेक कार्यक्रम आकाशवाणीने प्रसारित केले.
आपल्या भाषणाच्या,एकपात्री- बहुरूपी प्रयोगांच्या ध्वनिफिती तसेच पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन रसिकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

एकदा इंदूर येथील एका भाषणातून आपण विनयाने म्हणाला होता , " आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी निघाली कि माझे अंत:करण भरून येते. असे वाटते, आमच्यानंतर आमची पुस्तके दुरदुरच्या गावी शेकडो मैल मिरवायची गोष्ट सोडा, पण कोणी वाचनालयातून घरापर्यंत तरी नेईल का ? " आपल्या विनयशील भाषणाची आठवण दूर ठेवून आपणास वरील घटना कळवली आहे.

आपण प्रकृतीच्या कारणास्तव " मालतीमाधव" मध्ये राहायला आलात. परंतु आपल्याच शब्दात सांगायचे झाल्यास १२ जून ला आपण ' देवबाप्पा' कडे कुणालाही न सांगता निघून गेलात. आपण ' गणगोत' मध्ये 'रावसाहेब' या व्यक्तिचित्रणाचा समारोप करताना लिहिले," देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करायला दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या न मागता दिल्या होत्या,त्या न सांगता परत नेल्या."

आता 'मुक्तांगण','रुपाली' येथे नेमाने भरत असलेल्या बैठकी, मैफिली होणे नाही, मैफिलचा बादशाहाच निघून गेला आहे. आपल्या आधीच मैफिलीचा चांद रसिकाग्रणी रामुभैया, सिद्धहस्त कवी ग.दि. मा.,गानसम्राट वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व असे कितीतरी दिग्गज मैफिल सोडून गेले आहेत.
आपली बालमैत्रीण जोस्त्ना भोळे आपली वाट पाहत आहे. ती म्हणते आहे, ' परतुनी ये घरा.... ! '

आपले नम्र,
रसिक चाहते.
प्रणव उंडे
https://www.facebook.com/pranavaunde

0 प्रतिक्रिया: