Thursday, November 8, 2012

भारतीय अशी रंगभूमी आहे काय?

पु.ल. देशपांडे यांनी वेळोवेळी केलेल्या विविध विषयांवरील भाषणांचं संकलन ' पाचामुखी ' या नावाने आज  ' परचुरे प्रकाशन ' तर्फे प्रकाशित होत आहे. याच पुस्तकातील भारतीय रंगभूमीवर भाष्य करणारा पुलंचा लेख... 
' भारतीय रंगभूमी ' नावाचं काही वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे का ? किंवा ' भारतीय रंगभूमी ' म्हणून एखादी रंगभूमी निर्माण करता येईल काय ? याचा शोध गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चालू आहे. तीन वर्षांपूर्वी संगीत नाटक अकादमीनी दिल्लीत ' लोककला-लोकनाट्य किंवा पारंपरिक नाट्य यांचा आजच्या आधुनिक रंगभूमीशी काय संबंध आहे ?' याविषयी एक परिसंवाद आयोजित केला होता. काही वर्षांपूर्वी रंगभूमीविषयी बोलताना ब्रेख्त , इब्सेन , आयनेस्को या पाश्चात्त्यांची नावं घेऊन बोलायचं , असं जवळजवळ ठरून गेलं होतं , परंतु या परिसंवादात कुठल्याही युरोपीय नाटककाराचा उल्लेख झाला नाही. मी हे राष्ट्रीय अहंकारानी बोलत नाही. या परिसंवादात भाग घेतलेला प्रत्येक जण तोंडाला रंग लावून नाटकात काम करणारा होता. या परिसंवादातून असं एक लक्षात आलं की , लोककला किंवा पारंपरिक नाट्य , ज्याला आपण folk form म्हणतो , त्यातली पुष्कळशी शक्ती आपण दुर्लक्षितच केलेली आहे. हे सर्व फॉर्म्स आहेत तरी काय , याचा विचार करण्यासाठी अलीकडेच बंगळुरूला नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता.

बंगळुरूच्या भारतीय नाट्य संघानी संगीत नाटक अकादमीच्या सहकार्यानी हा महोत्सव साजरा केला. या महोत्सवात अव्यावसायिकांचे आणि व्यावसायिकांचे परिसंवादही झाले. कानडी रंगभूमीवरच्या बऱ्याचशा नाटक कंपन्या तालुक्याच्या गावाला , खेडोपाडी प्रयोग करणाऱ्या आहेत. ही माणसं शहरात जाऊन चर्चेत भाग घ्यायला बुजतात , पण या परिसंवादात आधीच ' तुमचे प्रश्न मोकळेपणाने , निःसंकोचपणे मांडा ' असा दिलासा दिल्यामुळे प्रत्येक जण आवेशाने आणि पोटतिडकीने बोलत होता.

मास्टर हिरण्णा यांच्या ' लंचावतार ' या फार्सचा प्रयोग पाहिला. हे तमाशासारखं नाटक. आपल्याकडच्या ' विच्छे ' सारखंच याचं थोडंफार स्वरूप. तत्कालीन दिवसांत घडलेल्या राजकीय घटनांवर रोज संध्याकाळी मार्मिक उपहासात्मक भाष्य , असं त्याचं स्वरूप. हे नाटक बंद पाडण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले , पण ते चालूच राहिलं. त्या नाटकामुळे या प्रकाराकडे शहरातल्या नाट्यरसिकांचं लक्ष वेधलं गेलं. याच काळात गिरीश कर्नाड आपली चांगली नोकरी सोडून ' यक्षगान ' चा अभ्यास करू लागले. ज्या खेड्यात या नाट्यविषयाचा उगम आहे , तिथे राहून , अभ्यास करून पुढे त्यांनी ' हयवदन ' लिहिलं. त्यांनी ' यक्षगान ' चं जे कानडीकरण केलं , त्यातली ताकद मराठी रूपांतरात आली नाही. ती केवळ कोरडी नक्कल होती. या सुमारास आपल्याकडच्या अनेक लेखकांचं लक्ष या folk forms कडे गेलं. याच सुमारास महाराष्ट्रात बादल सरकार आलं होतं. त्यांना मी बरेच तमाशे वगैरे दाखवले. लोकनाट्याचा हा प्रकार पाहून एखाद्या मराठी माणसानं हिरिरीनी तमाशाचा पुरस्कार करावा तसं ते म्हणाले , ' नवी नाटकं लिहिण्यासाठी मला तमाशातल्या शक्तीचा निश्चितपणे खूप उपयोग होईल! ' आंध्रमधल्या लोकांचं ' विथीनाटकम् ' म्हणजे street plays आहेत. यांत इतकी शक्ती आहे की , रंगपीठाचा अभाव असतानाही या नाटकाचा प्रयोग फार सुंदर होतो. उत्तर प्रदेशातल्या ' रामलीले ' चा तर प्रेक्षकांवर इतका प्रभाव पडतो आणि प्रेक्षक त्या प्रयोगाशी इतके समरस होऊन जातात की ; राम , लक्ष्मण आणि सीता वनवासाला जाण्याच्या प्रसंगाच्या वेळी सारे जण शरयू नदीच्या तीरापर्यंत त्यांना पोहोचवायला जातात. ' छाऊ ' हा कलाप्रकार पाहताना तर मी त्यातल्या एका कलावंताच्या आंगिक अभिनयातल्या कौशल्यानी भारावून गेलो. प्रयोग संपल्यानंतर त्याला मी भेटलो तेव्हा कळलं की , दिवसभर सायकलरिक्षा चालवणारा हा माणूस रात्री ह्या नाटकात काम करतो! तेव्हा साहजिकच मी त्याला विचारलं , ' दिवसभर सायकलरिक्षा चालवून दमूनभागून आल्यानंतर या प्रयोगात काम करायला उत्साह कसा राहतो ?' तेव्हा तो म्हणाला , ' यहाँसे शक्ती मिलती है! '

बदलत्या परिस्थितीमध्ये एका विशिष्ट परंपरेत चालत आलेले हे जे सर्व folk forms आहेत , हे कसे टिकणार आहेत ? त्यांचं नुसतं पुनरुज्जीवन करून भारतीय रंगभूमी निर्माण होणार आहे का ? त्यातून नेमका असा कुठला धागा आहे की ज्या धाग्याचा रंग आपल्याला सगळीकडे सापडतो , म्हणून त्याला भारतीय रंगभूमी म्हणावं ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ' भारतीय रंगभूमी ' असा शब्द वापरताना माझ्या मनात अनेक शंका येतात. मात्र हे सगळं पाहताना मला कुठेतरी मांडणीतलं साधर्म्य आढळतं. त्यातला आशयाचा भाग बाजूला ठेवून अभिव्यक्तीच्या बाबतीत तर मी सांगू शकेन की , सबंध भारतभर जे बरेचसे नाट्यप्रकार आहेत , त्यांच्यामध्ये विलक्षण साधर्म्य आहे. हे साधर्म्य कुठपर्यंत आहे , तर काश्मिरातल्या श्रीनगरच्या लोकांचं लोकनाट्य मी एकदा पाहिलं. पाहतो , तर त्यातल्या सूत्रधाराचा वेष आपल्या कोकणातल्या दशावतारातल्या खेळीयातल्या सूत्रधारासारखाच! संस्कृत नाटकातला सूत्रधार अनेक तऱ्हांची कामं करणारा असतो. सगळीकडे हा असलाच प्रकार दिसला. हा सूत्रधार आपलं स्वतःचं सूत्रधाराचं काम करताकरता नाटकातलं पात्र बनून बोलतो. दक्षिणेकडे आणि ओरिसा वगैरे भागांत खूपच विविधता दिसून येते. आपल्याकडे त्या मानाने विविधता कमीच! अभिनय किंवा नाटक किती तऱ्हांनी लोकांपर्यंत पोहोचवता येतं , त्याच्यासाठी कायकाय माध्यमं वापरायची ; अशा अनेक बाबतींत त्या भागातल्या लोकांनी खूपच प्रगती केलेली आहे. कधी शब्दांतून , कधी गीतांतून , कधी शब्द आणि गीत यांच्या एकत्रीकरणातून , तर कधी अभिनय आणि नृत्य यांच्या एकत्रीकरणातून नाट्य आकाराला येतं ; तर कधी मूकनाट्य हा रूपबंध स्वीकारून एकीकडे स्वगत आणि दुसरीकडे मूकाभिनय साकारला जातो. काही ठिकाणी नाटकातला अभिनय आणि नृत्यातला अभिनय यांच्या सीमारेषेवरील अभिनय सादर केला जातो ; तर काही ठिकाणी संपूर्णपणे नाटकातला अभिनय किंवा संपूर्णपणे नृत्यातला अभिनयही सादर केला जातो. या भागांत सादरीकरणाचे इतके विविध प्रकार सापडतात की , ह्या प्रकारांकडे दुर्लक्ष करणं पाप ठरेल. हे एवढं मोठं धन आहे ; आणि आत्तापर्यंत आपलं लक्ष त्यातल्या सामर्थ्याकडे गेलं नव्हतं! आपण आत्तापर्यंत जे बघत होतो , ते कौतुकानी आणि patronization च्या दृष्टीनी. पूर्वी जर कधी यातल्या कलावंतांना भेटलो , तर आम्ही त्यांचं नुसतं कौतुक करत असू. आता , ' हे असं केलंत , ते कसं केलंत , ते पुन्हा करून दाखवा आम्हांला ' असं सांगतो. आत्ता नाट्यक्षेत्रात सुदैवानी चांगलं वातावरण निर्माण झालं आहे.

साध्या अभिनयाकडून नृत्यातल्या अभिनयाकडे जाणारा आणि ज्याच्यामध्ये अभिनयाची अगदी परमावधी गाठली आहे असा folk form म्हणजे ' कथाकली '. या कथाकलीचं असामान्य दर्शन आम्हांला बंगळुरूमध्ये घडलं. गायन आणि अभिनय यांचा सांधा तिथे साधला गेला. त्या कलावंतांचं शिक्षण परंपरेनी चाललेलं होतं. पण ज्यांनी सगळ्या जगातील रंगभूमी पाहून येऊन तिचा अभ्यास केलेला आहे असे लोक त्या शिक्षणामध्ये आल्यावर त्यांनी कथाकलीतील सौंदर्य आणखी वाढवलं. कथाकली हा नृत्यनाट्यप्रकार तसा मल्याळम गीतांचा. पण सध्या कथाकलीचा एक नवा प्रयोग चालला आहे. कथाकलीसाठी हिंदी भाषेत गीतरचना केल्या जात आहेत. हिंदी चिजांना आणि हिंदी गीतांना कर्नाटकी संगीताची जोड दिली , तर अगदी काहीतरीच वाटेल , असं आपल्याला वाटतं. हे अगदी चूक आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की , तंजावरच्या राजांनी लिहिलेल्या मराठी गाण्यांना कर्नाटकी चाली होत्या. या गाण्यांमध्ये हे संगीत अभिनयाशी इतकं एकरूप झालेलं आहे की , त्यातल्या सुरावटींच्या , त्यातल्या लयकारींच्या आणि संगीताच्या अनुरोधाने गेल्याबरोबर त्या अभिनयाला फार उत्तम साथ मिळते. त्या गीतांपैकी ऐंशी टक्के गीतं संस्कृतच आहेत. रंगभूमीवरील नाट्यसंगीताचं - ते कसं आदर्श असावं याचं उदाहरण मला त्या कथाकलीच्या गायनात सापडलं. त्या गायकाचं नाव हैदरअली - त्याचे संस्कृत उच्चार अगदी शुद्ध आणि सुरेल आहेत. त्यामुळे कथाकलीमध्ये गायनाला किती महत्त्व आहे , हे मला कळलं.

या सगळ्या folk forms मधून , त्यांच्यातल्या सामर्थ्यातून , त्यांच्या वैशिष्ट्यांमधून आधुनिक रंगभूमीला पुष्कळ देणगी मिळेल. कारण त्यांचे विषय जरी रामायण-महाभारत आदी ग्रंथांतले असले , तरी तो form च इतका तेजस्वी आहे की , वाटेल तो आधुनिक विषय त्याच्यात येणं फारसं कठीण आहे , असं मला वाटत नाही. अर्थात form कुठला स्वीकारावा , हे पुष्कळ वेळा तो विषयच लेखकाला आतून सांगत असतो. मला असं वाटतं की , तुमच्या मनात जर उर्मी आली , तर या देशात पन्नास-साठ असे चांगले forms आहेत की , जे आपल्याकडे आणता येतील. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. या प्रयत्नांतून जी रंगभूमी निर्माण होईल , तिला खऱ्या अर्थानी ' भारतीय रंगभूमी ' म्हणता येईल!
-- पु.ल. देशपांडे


रविवार ४ नोव्हेंबर २०१२
महाराष्ट्र टाईम्स

0 प्रतिक्रिया: