Wednesday, August 1, 2012

॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥

१९६४-६५ च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रावरील भाषणांचा कार्यक्रम मुंबईत विलेपार्ले येथे पु. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. पु. लं. नी बाबासाहेबांना लिहिलेले मानपत्र त्याप्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रसिद्ध झाले होते. आज ती स्मरणिका उपलब्ध नाही. परंतु पु. लं. च्या हस्ताक्षरात सापडलेला हा कच्चा खर्डा पु. लं. चे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी खास ‘लोकसत्ता’साठी उपलब्ध करून दिला.. आज नव्वदी पार करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या झपाटल्या व्यक्तिमत्त्वाचा हा ‘पुल’कित प्रत्यय..


श्री बलवन्त मोरेश्वर तथा बाबा पुरंदरे यांसी-
शिवराय मंडळाच्या समस्त सदस्यांचे आणि हितचिंतकांचे सादर प्रणाम.
आपणास मनापासून जी गोष्ट मानवत नाही, ती आज आम्ही करीत असल्याबद्दल प्रथम आपली क्षमा मागतों. आपल्या स्नेहाचा मान लाभलेले आम्ही आपले सवंगडी आहों. मानसन्मानापासून अलिप्त रहाण्याचा आपला स्वभावधर्म आम्हास ठाऊक आहे. आपला स्नेह हा जसा आमचा सन्मान आहे, तसाच त्या स्नेहापोटी आम्हाला आपल्यापाशीं कांहीं हट्ट धरण्याचा अधिकारही आहे. त्या अधिकारापोटींच आम्ही ह्य़ा मानपत्राचा स्वीकार करण्यास आपणास भाग पाडणार आहों.

‘शिवरायाचे आठवावे चरित्र। शिवरायाचा आठवावा प्रताप।’ ही ऊर्मी आपण आमच्या मनांत उत्पन्न केलीत. जिथे कोणी कोणाचा नाहीं ह्य़ा भावनेपरती दुसरी भावना निर्माण होत नाहीं अशा ह्य़ा अफाट मुंबई शहरांत आपण शिवरायाचे चरित्र आमच्यापुढें उलगडून दाखवलेत आणि आमची अंत:करणे एका अलौकिक आणि चैतन्यमय बंधनाने एकत्र आणलीत. कैलासापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या ह्य़ा अफाट देशाला आपण सारे एका नात्यानें, पावित्र्याच्या एकाच कल्पनेने बांधलेले लोक आहों.. ह्य़ा लोकांचे हिंदवी स्वराज्य असावे ही श्रीं ची इच्छा आहे.. हा एकतेचा पहिला पाठ देणाऱ्या श्री शिवरायाच्या चरित्राच्या वाचनानें आमच्या मनातली किल्मिषें दूर झाली. परकीयांच्या अमलाखालीं केवळ स्वरक्षणार्थ बाहेर पडणाऱ्या म्यानांतल्या तलवारीच गंजत नाहीत, तर मनेही गंजतात. प्रथम घासूनपुसून उजळावी लागतात ती मनं. मनं उजळली की मनगटं उफाळतात. साडेतीन हात उंचीच्या मावळ्यांची भेदरलेली मनं सह्य़ाद्रीच्या गगनचुंबी कडय़ाएवढी उंच आणि कणखर करणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचे आपल्या तेजस्वी शैलीतले लेखन हा आजच्या निराशजनक वातावरणांत आम्हाला दिसलेला पहिला आशेचा किरण.

श्री शिवरायांच्या महान कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वीचा तो पारतंत्र्याचा काळ. आपल्याच शब्दांची उसनवारी करून सांगायचं म्हणजे- हुंदकादेखील मोठय़ाने द्यायचा नाहीं असली दुरवस्था. साऱ्या जनतेची अवस्था ‘कोठें जावे, काय करावें’ अशी व्हावी ह्य़ात नवल नव्हतं. पण आज तर आम्ही आमचे धनी आहों, तरीही मनाच्या तसल्याच अवस्थेंत जगण्याचा प्रसंग उभा रहावा ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट. सर्वत्र निराशा. सर्वत्र अपेक्षाभंग. सर्वत्र ध्येयहीनता. असल्या ह्य़ा काळांत आपल्या अभ्यासिकेतला दिवा मात्र रात्र उलटून गेली तरी जळत होता. भोवती महागाईची खाई पेटलेली. पण आपण पानात पडलेल्या चतकोराला पक्वान्न मानून शिवचरित्राच्या लेखनांत रंगला होता. जिथे जिथे श्री शिवरायाचे चरण उमटले, त्या त्या ठिकाणची यात्रा करीत होता. जिवाची तमा न बाळगतां गडकोट चढत होतां. शिवचरित्राच्या ध्यासात रानावनातल्या काटय़ाकुटय़ांची आपल्या पायदळी जणु मखमल होत होती. भीषण रात्री, पावसाळी वादळें, अंगी चिकटून रक्त शोषण करणाऱ्या जळवा यांची तमा न बाळगतां शिवकालातला एखादा शिलालेख, एखादा कागद, एखादी नोंद, एखादे नाणे, एखादं शिवकालीन शस्त्र.. नव्हे, जिथे ह्य़ा हिंदवी स्वराज्यासाठी देहाची चाळण केलेल्या शिलेदार बारगिराच्या रक्ताचा थेंब सांडला असेल तिथली माती भाळी लावण्यासाठी आयुष्याची थोडीथोडकी नव्हेत, तर वीस र्वष आपण एखाद्या परिव्राजकाच्या निष्ठेने हिंडत राहिलात.

बाबासाहेब,
असल्या ह्य़ा तपश्चर्येतून निर्माण झालेले आपले शिवचरित्र. मुळांतच ओजस्वी. हिऱ्यासारखे लखलखणारे. त्या हिऱ्याला आपल्या तप:पूत प्रतिभेचे अलौकिक कोंदण लाभलें. आपण स्वत: इतिहासकार न म्हणतां बखरकार म्हणवतां. विद्वान न म्हणवतां शाहीर म्हणवतां. पण इतिहास म्हणजे केवळ तपशिलांची जंत्री नव्हे. इतिहासानें देशाचे शील दाखवावे; केवळ तपशील नव्हे. शिवरायाच्या स्मरणानें आपल्या भावना उफाळून येतात. ज्यांची अंत:करणे पूर्वजांच्या उपकारांची कृतज्ञता स्मरतात, ती उफाळून येणारच. शिवचरणांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या कडय़ाकपाऱ्यांच्या दर्शनाने जी अंत:करणे उचंबळून येत नाहीत त्यांच्या दुर्भाग्याची त्या दगडी कडेकपाऱ्याही कींव करीत असतील. पण आपल्या भावनांना शास्त्रकाटय़ांची कसोटी लागलेली असते. निरुपणामागे खात्री-पुराव्यांचे आधार असतात. प्रतिभेचे वारू सत्यावरची मांड सोडून उधळत नाही. प्रतिभेला परिष्करणाची जोड आहे. प्रज्ञेची धगधगती ज्वाला आहे. आपण शिवरायाच्या ठिकाणी सश्रद्ध आहात; अंधश्रद्ध नाहीं. आणि म्हणूनच आजच्या युगातही आमच्या अंतकरणाला स्पर्श करून जाते तें शिवचरित्रातील अंतर्यामीचे तत्त्व. लढायांचा तपशील नव्हे.
ज्या राज्यात अन्यायाचा नि:पात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले. आपल्या आचरणानें प्रत्यक्षात आणले. आपण तो सारा चरित्रपट आमच्या डोळ्यांपुढे उभा केलात. आमच्या गंजू पहाणाऱ्या मनांना मानाने जगण्याचा अर्थ शिवचरित्रातून उलगडून दाखवलात.
बाबासाहेब, त्या कृतज्ञतेची ही पावती आहे. मानपत्राची भाषा आम्ही जाणत नाहीं. छत्रपतींच्या मावळ्याइतक्याच रांगडय़ा बोलीशी परिचय असलेले आम्ही आपले स्नेही. आपले संकल्प थोर. त्या संकल्पाचा जगन्नाथाचा रथ एकटय़ानें ओढण्याचे आपले सामथ्र्य आम्ही जाणतो. पण त्या रथाच्या दोराला आम्ही हात घातला तो आमच्या पदरी चिमुकल्या पुण्याचा संचय व्हावा म्हणून. शिवचरित्राचे सहस्रावधी श्रोत्यांपुढे आपल्या ओजस्वी वाणीने निरुपण करून आपण लक्ष रुपये समाजकार्याला देण्याचा संकल्प पार पाडलात. आज भोवताली द्रव्यलालसेची आणि सत्तालालसेची हिडिस भुतें नाचत असताना, केवळ आर्थिक गरिबीचा वसा घेतलेल्या शिक्षकाच्या आपल्यासारख्या सुपुत्राने लक्ष रुपये मिळवण्याचा संकल्प करायच्या या काळात लक्ष रुपये मिळवून एका महान कार्याला ते ‘इदं न मम’ ह्य़ा भावनेने अर्पण करण्याचा संकल्प करून तो पुरा करावा, हा एक चमत्कार आहे. व्यवहारी जगात हे वेड ठरेल. पण व्यवहारी जगाला ही भाग्याची वेडं कळत नाहींत. आम्ही आमच्या दुबळ्या डोळ्यांनी आणि चिमुकल्या अंत:करणांनी आपला हा पराक्रम पाहून चकित झालों आहोत. अंतर्यामी समाधान एवढेच, की ह्य़ा कार्यात आपल्यासोबत चार पावलें चालण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
बाबासाहेब, हे महान कार्य करण्याची जिद्द आपणांत श्री शिवरायांच्या चरित्रामुळे निर्माण झाली हे तर खरेंच; परंतु आपल्या जीवनातल्या सहचारिणीचा- सौभाग्यवती निर्मलावहिनींचा गौरवपूर्वक उल्लेख केलाच पाहिजे. यज्ञकर्म हे यजमान आणि यजमानपत्नी दोघांनी जोडीने केले तर सफल होते. आपण मांडलेल्या शिवचरित्राच्या वाग्यज्ञातले आपल्या सहधर्मचारिणीचे स्थान फार मोठे आहे. आपला यज्ञ निर्वेध चालावा म्हणून विकल्प निर्माण करणाऱ्या कुठल्याही प्रसंगाची झळ आपणापर्यंत पोहोंचू न देण्याचे सौ. निर्मलावहिनींचे कार्य हे यज्ञातल्या संरक्षक देवतेसारखे आहे अशी आमची मनोमन धारणा आहे. म्हणून हे मानपत्री त्यांना आमचे लक्ष प्रणाम.

बाबासाहेब, महन्मंगल कुलस्वामिनी श्री जगदंबेच्या चरणी आमची शेवटी एकच प्रार्थना आहे कीं, आपणा उभयतांना आणि आपल्या सुकन्या-सुपुत्रांना उदंड यश आणि दीर्घायुरारोग्य लाभों. आपल्या महान कार्यात आम्ही सहाय्य तें कसले करणार? पण शिवचरित्राच्या कार्यविषयक चाकरी सांगावी, आम्ही इमानाने पार पाडू असे अभिवचन देतो. आम्हास साक्षात् रोहिडेश्वराची आण. सेवा करावया लावा। देवा हा योग्य चाकर.

लोकसत्ता 
रविवार , २९ जुलै २०१२

हा लेख ब्लॉगसाठी सुचविल्याबद्दल पिनाकीन गोडसे ह्यांचे आभार.

8 प्रतिक्रिया:

Sandeep Dudam संदीप दुडम said...

मैलाचा दगड ठरावे असे हे अप्रतिम मानपत्र आहे. वाचून फारच आनंद झाला.
उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद!

♫ ~ RhythM ~ ♫ said...

wah raje,

apratim!!!

Unknown said...

Atishay chhan aahe.. Wachun far bare watale..

Unknown said...

FARACH CHHAN

ATISHAY BARE WATALE..

Unknown said...

FARACH CHHAN

ATISHAY BARE WATALE..

Mohan kardekar said...

Great, outstanding, par excellence. I am blessed and obliged.Thanks
Mohan Kardekar

chimankarravi said...

shrimant BAbasaheb Purandare yana manacha mujara..............


sir ek vinati aahe aapla ha lekha mala mazaya facebook page varti post karaya cha aahe tatapurvi aaple parvangi aapriharya aahe

aapn parvangi dayal yachi mala aasha aahe

Nishant Gilatar said...

Gangot pustakaat Babasaheb baddal ek lekh aahe, te hech aahe ka?